दहावी आणि बारावीच्‍या प्रश्‍नपत्रिका जाळल्‍या की, जळाल्‍या.? - आ. विखे पाटील

संगमनेर Live
0
महाविकास आघाडी सरकारच्‍या काळात सर्वच परिक्षा संशयाच्‍या भवऱ्यात 

◻ कॉग्रेसला आपली प्रतिमा सुधरायची असेल तर, आघाडी सरकारमधून बाहेर पडा

संगमनेर Live (लोणी) | दहावी आणि बारावीच्‍या प्रश्‍नपत्रिका घेवून जाणाऱ्या टेम्‍पोला लागलेल्‍या आगीची घटना अतिशय गंभिर असून, प्रश्‍नपत्रिका जाळल्‍या की, जळाल्‍या याची उच्‍चस्तरीय चौकशी करण्‍याची मागणी माजी मंत्री आ. राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

महाविकास आघाडी सरकारच्‍या काळात भरती प्रक्रीयेसाठी कोणतीही परिक्षा पारदर्शकपणे होवू शकलेली नाही. सर्वच परिक्षांच्‍या प्रश्‍नपत्रिका फुटण्‍याचे प्रकार वारंवार घडल्‍याने या सरकारच्‍या काळात सर्वच परिक्षा संशयाच्‍या भवऱ्यात अडकल्‍या असल्‍याची टिका करुन, आ. विखे पाटील म्‍हणाले की, दहावी बारावीच्‍या परिक्षा तोंडावर आल्‍या असताना प्रश्‍नपत्रिका घेवून जाणाऱ्या टेम्‍पोला लागलेल्‍या आगीची घटना अतिशय गंभिर असल्‍याकडे त्‍यांनी लक्ष वेधले.

काल परिक्षा महामंडळाने तांत्रिक कारण सांगून पेपरच्‍या तारखा पुन्‍हा नव्‍याने जाहीरही करुन टाकल्‍या. परंतू यातील नेमके तांत्रिक कारण कोणते.? असा प्रश्‍न अनुत्‍तरीतच राहतो. प्रश्‍नपत्रिका जळाल्‍या की, जाळल्‍या याबाबत कोणताही खुलासा परिक्षा महामंडळ करु शकलेले नाही. त्‍यामुळे या घटनेची उच्‍चस्‍तरीय चौकशी करण्‍याची मागणी आ. विखे पाटील यांनी केली.

एकीकडे कोव्‍हीड संकटाने सर्वाधिक नुकसान शिक्षण क्षेत्राचे झाले आहे. सरकार स्‍वत:चेच निर्णय मागे घेत राहीले. शाळा सुरु करण्‍यापासून ते दहावी, बारावीच्‍या परिक्षांच्‍या बाबतीतही सरकार ठाम राहीले नाही. आघाडी सरकारचा कारभार हा पुर्णत: गोंधळलेला असल्‍याची टिका करुन, सरकारच्‍या निर्णयातील धरसोड वृत्‍तीच विद्यार्थी आणि पालकांची चिंता वाढवत असल्‍याचे आ. विखे पाटील म्‍हणाले.

केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्‍याच्‍या महाविकास आघाडीच्‍या नेत्‍यांकडून होत असलेल्‍या आरोपाचा इन्‍कार करुन, आ. विखे पाटील म्‍हणाले की, केवळ आपले अपयश झाकण्‍यासाठी असे आरोप केले जात आहेत. भ्रष्‍टाचाराची प्रकरण उघड होतील अशी भिती असल्‍यानेच जनतेचे लक्ष विचलीत करण्‍याचे काम महाविकास आघाडीच्‍या नेत्‍यांकडून होत असल्‍याचे त्‍यांनी स्‍पष्‍ट केली.

आघाडी सरकारमधील कॉंग्रेसच्‍या सहा मंत्र्यांच्‍या खात्‍यांमध्‍ये  होत असलेल्‍या संभाव्‍य बदल्यांच्‍या चर्चेवर भाष्‍य करताना आ. विखे पाटील यांनी कॉग्रेसला आपली प्रतिमा सुधरायची असेल तर, आघाडी सरकारमधून बाहेर पडले पाहीजे. परंतू भ्रष्‍टाचाराच्‍या विळख्‍यात ते अडकले आहेत. मंत्री राहीलो तर संरक्षण मिळेल आणि सत्‍तेतून बाहेर पडलो तर बेड्या पडतील अशी भिती त्‍यांना सतावत असल्‍यानेच ते होणे शक्‍य नाही. त्‍यामुळे कॉग्रेसच्‍या भवितव्‍याची कोणालाही चिंता नसल्‍याचा टोला त्‍यांनी लगावला.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !