मेरी संस्थेत भूकंपाबाबत कोणतीही नोंद नाही
संगमनेर Live (राजू नरवडे) | संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील घारगाव येथे बुधवारी (दि. ९) सकाळी भूकंपसदृश्य धक्क्यांनी हादरले. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांनी घाबरुन जावू नये असे आवाहन संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांनी केले आहे.
बुधवारी सकाळी जोराचा आवाज झाल्याने घारगाव येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आवाजाची तीव्रता मोठी असल्याचे सामाजिक कार्यकर्ते सलीम शेख, सतीश धात्रक, आमीर शेख आदी नागरिकांनी सांगितले. तर काही वर्षापासून बोटा, माळवाडी, केळेवाडी, कुरकुटवाडी या गावांसह आदी गावांना भूकंपाचे धक्के बसले आहेत.
त्या धक्क्यांच्या नोंदीही नाशिक येथील मेरी संस्थेच्या भूकंपमापक यंत्रावर झाल्या आहेत. याचबरोबर मेरी संस्थेच्या वरीष्ठ भू- वैज्ञानिक चारूलता चौधरी यांच्यासह वरीष्ठ अधिकार्यांनी याठिकाणची अनेकदा पाहणी केलेली आहे. तर पठारभागातील कौठे बुद्रुक व आंबीखालसा परिसरातही सौम्य धक्के जाणवल्याचे नागरीकाचे म्हणणे आहे.
या संदर्भात नाशिक येथील मेरी संस्थेशी संपर्क साधला आहे. अद्यापपर्यंत भूकंपाबाबत कोणतीही नोंद झालेली नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जावू नये, असे आवाहन तहसीलदार अमोल निकम यानी केले आहे.