◻ सहकार चळवळीतील शिलेदार पाराजी चकोर याचा खळी येथे अभिष्टचितंन सोहळा व भव्य शेतकरी मेळावा संपन्न
संगमनेर Live | पाण्यासाठी संघर्ष करून तालुक्यात समृद्धी निर्माण करण्यात जुन्या पिढीतील कार्यकर्त्यांचे मोठे योगदान आहे. पाराजी चकोर यांनी पाणी, शिक्षण व सहकारात आयुष्यभर समर्पित भावनेने काम केले असून विकासातून वैभवाकडे जाणाऱ्या संगमनेर तालुक्याने कायम कार्यकर्त्याचा सन्मान जपला आहे. गोरगरिबांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे काम, नेतृत्वाचा विश्वास आणि जनतेचे प्रेम यामुळे संगमनेरचा राज्यात मोठा सन्मान असल्याचे प्रतिपादन काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ नेते व राज्याचे महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
संगमनेर तालुक्यातील खळी येथे आयोजित भव्य शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष ॲड. माधवराव कानवडे होते. व्यासपीठावर महानंदचे चेअरमन रणजितसिंह देशमुख, बाबासाहेब ओहोळ, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, लक्ष्मणराव कुटे, सभापती शंकरराव खेमनर, सौ. सुनंदाताई जोर्वेकर, सौ. मीराताई शेटे, गणपतराव सांगळे, संपतराव डोंगरे, संतोष हासे, दूध संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र चकोर तसेच खळी, झरेकाठी, दाढ, चनेगाव, पिंप्री लौकी - अजमपुर या गावांमधील विविध संस्थांचे पदाधिकारी नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना नामदार थोरात म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार अत्यंत चांगले काम करत आहे. अडचणीत असूनही शेतकऱ्यांना मोठी मदत केली आहे. या सर्व संकट काळानंतर संगमनेर तालुक्यातील विविध विकास कामांसाठी सातत्याने मोठा निधी मिळवला आहे. संगमनेर मधील साखर कारखाना, दूध संघ व इतर सहकारी संस्था अत्यंत चांगले काम करत असून यामुळे तालुक्यात आर्थिक समृद्धी निर्माण केली आहे.
समान संधी देवून कायम सर्वांचा सन्मान केला आहे. गोरगरीब माणसाच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे काम संगमनेरमध्ये केले जात आहे. प्रामाणिक काम जनतेचे प्रेम व नेतृत्वाचा विश्वास यामुळे आपल्याला कायम यश मिळत आहे. आपण कधीही कुणाचे वाईट केले नाही. विचारांवर निष्ठा ठेवली. अडचणीच्या काळात पक्षाची धुरा सांभाळली. यामुळे पक्षात आणि राज्यात कायम सन्मान मिळतो आहे. हा सन्मान संगमनेर तालुक्यातील जनतेचा आहे.
सहकारातील कार्यकर्त्यांनी या सहकारी संस्था प्रपंच्यासारख्या सांभाळल्या आहेत. या विभागाने कायम आपल्या वर भरभरून प्रेम केले आहे. तालुक्यात सध्या सात लाख लिटर दुधाचे उत्पादन होत असून यामुळे ग्रामीण अर्थकारण मजबूत झाले आहे. मागील अडीच वर्षापासून निळवंडेच्या कालव्यांचे काम रात्रंदिवस सुरू आहे. महसूल विभागामध्ये डिजिटल सातबारा, इ पीक पाहणी असे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. या सर्व विकासाच्या वाटचालीत सर्वांचे योगदान महत्त्वाचे असून हीच परंपरा आपण कायम ठेवण्यासाठी सर्वांनी आपला तालुका आपली अस्मिता म्हणून एकत्रित काम करावे असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी ॲड. माधवराव कानवडे, रणजितसिंह देशमुख, बाबासाहेब ओहोळ, शंकर खेमनर, गणपतराव सांगळे, राजेंद्र चकोर यांचीही भाषणे झाली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दूध संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र चकोर यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर यांनी सर्जेराव चकोर आभार मानले.
नामदार बाळासाहेब थोरात यांनी माझ्यावर कायम विश्वास टाकला. कायम माझा वडीलधारी या नात्याने खूप आदर सन्मान केला असल्याचे मनोगत संत्काराला उत्तर देताना जेष्ठ नेते पाराजी चकोर यानी व्यक्त केले.