प्रभु श्रीरामाला कधीही विसरु नका - हभंप संजय महाराज वेळुकर

संगमनेर Live
0
आश्वी येथे श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा दिमाखात साजरा

◻ १ कोटी रुपये पेक्षा अधिक खर्च करुन ऐतिहासिक श्रीराम मंदिराचा जिर्णोध्दार पुर्ण

संगमनेर Live | आश्वी येथे प्रभु श्रीरामाचे भव्य मंदिर उभारण्यात आले आहे. त्यामुळे आता पंचक्रोशीतील नागरीकानी दैनंदिन या मंदिरात येऊन प्रभु श्रीरामाचे दर्शन घ्यावे. यावेळी प्रभु श्रीरामाशी आता तुम्ही बोलले पाहिजे. भारतीय संस्कृती व अध्यात्मात प्रभु श्रीरामाला अनन्य साधारण महत्व असून प्रभु श्रीरामाचे जीवनचरित्र प्रत्येकाने जीवनात अवलंबणे गरजेचे असल्याने प्रभु श्रीरामाला कधीही विसरु नका. असे मौलिक मार्गदर्शन हभंप संजय महाराज वेळुकर यानी केले.

संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथिल ऐतिहासिक अशा श्रीराम मंदिराच्या जिर्णोध्दारानिमित्त आयोजित मुर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन सोहळा नुकताचं पार पडला असून यावेळी हभंप संजय महाराज वेळुकर यांचे अमृततुल्य किर्तणाला संगीत अलंकार भगुरे गुरुजी यांची संगीत साथ लाभली. याप्रसंगी प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन सोहळ्यासाठी हभंप दत्तगिरी महाराज उपस्थित होते. यावेळी हा दिमाखदार सोहळा पंचक्रोशीतून उपस्थित असलेल्या हजोरो भाविकाच्या डोळ्याचे पारणे फेडणारा असल्याची भावना उपस्थित भाविकानी व्यक्त केली.

आश्वी बुद्रुक येथे सुमारे दिडशे वर्षापुर्वीचे पुरातन असे प्रभु श्रीराम, माता सीता, बंधु लक्ष्मण, भरत व शत्रुघ्न यांचे संयुक्त उत्तर मुखी अहमदनगर जिल्ह्यातील एकमेव मंदिर आहे. या मंदिरासमोर दक्षिणमुखी मारुती मंदिर तसेच विविध धर्मियाची श्रध्दास्थाने असल्याने परिसरात नेहमी वर्दळ असल्याने या परिसरात भक्तीचे वातावरण पहावयास मिळत असते.

त्यामुळे ग्रामस्थाच्या पुढाकारातून प्रत्यक्ष या मंदिर जिर्णोद्धाराचे भुमीपुजन करुन काम हाती घेऊन सुमारे १ कोटी रुपये खर्च करून भव्य व दिमाखदार मंदिर पुर्ण झाले आहे. या मंदिरात प्रभु श्रीराम, माता सीता, जैन धर्मियाचे २३ तीर्थकर पार्श्वनाथ प्रभु, बालाजी भगवान, साईबाबा, नरहरी महाराज, ज्ञानेश्वर महाराज, गोंदवलेकर महाराज, गणपती, राधाकृष्ण यांच्या मुर्त्याची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. तसेचं समोर दक्षिणमुखी मारुतीचे मंदिर निर्माण करण्यात आले असून या दोन्ही मंदिरामुळे आश्वी बुद्रुकच्या वैभवात भर पडली आहे.

आश्वी परिसरात अत्यंत सुंदर व आकर्षक बनवलेल्या या राम मंदिरात भव्य सभामंडप आहे. गाभाऱ्यात श्रीराम, लक्ष्मण व सीतामाईची प्रसन्न  मूर्ती असून मंदिराच्या समोरील छोट्या खाणी गाभाऱ्यात श्रीराम भक्त हनुमानाचे मंदिर आहे. ही मूर्ती अत्यंत देखणी आहे.

या सोहळ्याप्रसंगी बाळकृष्ण होडगर, ब्रिजमोहन बिहानी, माधवराव गायकवाड, रामजी नाके, विनायकराव बालोटे, नानासाहेब डोईफोडे, विठ्ठल गायकवाड, सुशील भंडारी, योगेश रताडिया, संजय गांधी, भाऊराव कांगुणे, नारायण म्हसे, सरपंच महेश गायकवाड, उपसंरपंच राहुल जऱ्हाड, भाऊसाहेब ताजणे, भाऊसाहेब गायकवाड, गीताराम गायकवाड, संतोष म्हसे, राजेंद्र गायकवाड, पंकज नाके, पपलेश लाहोटी आदींसह सनी भंडारी व त्यांचे सहकारी तान्हाजी नागरे तसेच त्याचे युवक मित्र मंडळ, आश्वी इंग्लिश विद्यालयाचे विद्यार्थी, गावातील सर्व युवक मंडळ ग्रामपंचायत सदस्य व नागरिकांनी या सुंदर कार्यक्रमाचे आयोजनासाठी विशेष मेहनत घेतली. 

दरम्यान अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्याचे आभार प्रदर्शन गावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच महेश गायकवाड यांनी केले.

या कार्यक्रमादरम्यान प्रभु श्रीरामाचे भक्त म्हणून प्रसिद्ध असलेल्या वानरानी हनुमान मंदिरात येऊन श्रीरामाचे व हनुमानाचे दर्शन घेतले. यावेळी हा अभूतपूर्व सोहळा पाहण्यासाठी संपूर्ण गाव याठिकाणी लोटला होता. तर श्रीराम मंदिर जिर्णोध्दार करण्यात दानशूर व्यक्तीमत्व सुमतीलाल गांधी यानी विशेष परिश्रम घेतल्यामुळे ग्रामस्थाकडून त्याचा सत्कांर करण्यात आला.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !