◻️उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा तरुणाना दिलासा
◻️११ लाखांहून अधिक अर्ज दाखल
◻️नॉन क्रिमिलीयर बाबत घेतला हा निर्णय.?
संगमनेर Live | राज्यातील पोलीस भरतीबाब अर्ज भरण्यासाठी आता १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून १५ डिसेंबर २०२२ पर्यंत मुदत वाढवण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “पोलीस भरतीच्या संदर्भात आतापर्यंत आमच्याकडे ११ लाख ८० हजार अर्ज आलेले आहेत. तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याच्या तक्रारारीही काही ठिकाणांहून येते आहेत. त्यामुळे अर्ज भरण्याची तारीख आम्ही १५ दिवसांनी वाढवत असून उर्वरीत ज्या तक्रारी आहेत, त्याही याकाळात दूर होतील.”
तसेच “नॉन क्रिमिलीयरच्या संदर्भातही काही तक्रारी आल्या होत्या. मागील वर्षीचं नॉन क्रिमिलीयर प्रमाणपत्र यावर्षी मिळतं. त्यामुळे मागील वर्षीचं त्यांनी यावर्षी घेतल्यावर ते ग्राह्य धरलं जाणार आहे. ही अडचणही दूर करण्यात आलेली आहे. भूकंपग्रस्तांचाही यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे.
दरम्यान पोलीस भरती संदर्भातील ज्या काही मागण्या होत्या, त्या सगळ्या आम्ही मान्य केलेल्या आहेत.” असंही यावेळी फडणवीस म्हणाले आहेत. तर अर्ज भरण्यासाठी वेळ मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यानी याप्रसंगी सांगितले आहे.