संगमनेर Live | मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी व कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पदवीधर निवडणूकीसाठी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी म्हणजे सोमवार दि. ३० जानेवारी रोजी असणारा संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथिल आठवडे बाजार बंद राहणार असल्याचे आदेश प्रशासनाने काढले आहेत.
नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी सोमवार दि. ३० जानेवारी रोजी मतदान होणार आहे. मतदानाच्या दिवशी गावात भरणाऱ्या आठवडे बाजारामुळे कामामध्ये कोणताही व्यत्यय येऊ नये आणि कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्याच्या दृष्टीने मतदानाच्या दिवशी हा आठवडे बाजार बंद ठेवण्यात आला आहे.
आश्वी बुद्रुक आठवडे बाजारास परिसरातील २० ते २५ गावांचा संपर्क येतो. यामुळे या बाजारात मोठी आर्थिक उलाढाल होत असते. तसेच या आठवडा बाजारात स्थानिक व्यवसायाबरोबरच अन्य ठिकाणचे लहान मोठे व्यावसायिकदेखील आपली दुकाने घेऊन येतात. भाजीपाला, फळे, कापड, धान्य, चप्पल, कटलरी साहित्य, शालेय साहित्य, खेळणी आदींची खरेदी-विक्री होऊन छोट्या व्यावसायिकांच्या देखील पदरात दोन पैसे पडतात.
मात्र, सोमवारी भरणारा आठवडी बाजार बंद असल्यामुळे शेतकरी तसेच छोट्या व्यावसायिकांना अर्थिक झळ सोसावी लागणार असली तरी मतदान प्रक्रीया शांततेत पार पडावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.