◻️ महसूल मंत्री ना. विखे राधाकृष्ण पाटील यांची माहिती
◻️ पदाधिकारी व कार्यकर्त्यानी नागरीकांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन
संगमनेर Live (लोणी) | शासकीय कार्यालयांमधून आवश्यक असलेल्या सर्व योजनांसाठीचे कागदपत्र, दाखले नागरीकांना सहज सोप्या पध्दतीने उपलब्ध व्हावेत म्हणून सर्व तालुक्यांमध्ये शासन आपल्या दारी हा उपक्रम सुरु करण्यात येणार असून, या माध्यमातून जनतेच्या समस्याही जाणून घेण्याच्या सुचना महसूल विभागातील आधिकाऱ्यांना दिल्या असल्याची माहीती महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
महसूल विभागातून आवश्यक असलेले दाखले मिळण्यास बहुतांशी वेळा विलंब होतो. योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेल्या कागपत्रांमध्ये त्रृटीही असतात. त्यामुळे सामान्य माणसाला योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागते. शाळा, महाविद्यालयांच्या कामकाजासाठी आवश्यक असलेल्या दाखल्यांकरीताही विद्यार्थ्यांना निर्माण होणाऱ्या अडचणी प्रवेशापुर्वी दूर व्हाव्यात, शिधापत्रिका, संजय गांधी निराधार योजना, प्रधानमंत्री आवास योजनेसाठी आवश्यक असलेले कागदपत्र नागरीकांना सहज उपलब्ध व्हावेत हा या मागील उद्देश असल्याचे त्यांनी मंत्री ना. विखे पाटील म्हणाले.
जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये तहसिल कार्यालयाच्या वतीने गावपातळीवर शासन आपल्या दारी या उपक्रमाचे नियोजन करावे. त्या त्या गावांमध्ये या उपक्रमाचे कॅम्प लागण्यापुर्वी नागरीकांना माहिती कळवावी, तसेच महसूल विभागातील सर्व योजनांचे स्वतंत्र विभाग करुन, नागरीकांचे अर्ज दाखल करुन त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात अशा सुचना आपण आधिकाऱ्यांना दिल्या असल्याचे स्पष्ट करुन, या महिन्यातच सर्व ठिकाणी शासन आपल्या दारी उपक्रमाचे नियोजन करुन, पुढील १५ दिवसात हे सर्व दाखले नागरीकांना कसे मिळतील याचे प्रयत्न आधिकाऱ्यांनी करावे अशाही सुचना त्यांनी दिल्या आहेत.
तालुका स्तरावर आयोजित केल्या जाणाऱ्या शासन आपल्या दारी या उपक्रमात भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही सहभाग घेवून नागरीकांच्या समस्या सोडविण्यासाठी यामध्ये पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे.