धनगर आरक्षणाचा विषय चर्चेने सोडविण्यासाठी प्रयत्नशील - ना. विखे पाटील

संगमनेर Live
0
धनगर आरक्षणाचा विषय चर्चेने सोडविण्यासाठी प्रयत्नशील - ना. विखे पाटील 

◻️ भंडाऱ्याची उधळण झाल्याचा आनंदच!

◻️ भंडारा उधळणाऱ्यांवर कारवाई होणार नसल्याचे विखे पाटील यांचे संकेत 

संगमनेर LIVE (शिर्डी) | पवित्र भंडाऱ्याची माझ्यावर उधळण केल्याचा मला आनंदच झाला. तेव्हा भंडारा उधळणाऱ्यांवर कोणतीही कारवाई नको. आरक्षण हा विषय संवेदनशील असून प्रश्न चर्चेने सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. तसेच धनगर आरक्षणासंदर्भातील भावनांबद्दल सरकार संवेदनशील असल्याची प्रतिक्रिया राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली आहे. 

राज्यातील कोणत्याही समाजाच्या मागण्यांबाबत आम्ही सरकारमधून नेहमीच सकारात्मक विचार करतो, याही पुढे जाऊन सांगतो आपल्या मागण्यांसाठी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्रिमंडळासमोर जाऊन आपल्या समस्या, आपला आवाज तिथे प्राधान्याने मांडेन. प्रश्न कोणताही असो तो चर्चेने आणि संवादाने सोडवता येतो, यावर माझा ठाम विश्वास असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

माझा मतदार संघ असो, मंत्रालय असो की पालकमंत्री म्हणून सोलापूर जिल्हा असो, त्या त्या ठिकाणी येऊन भेटणाऱ्या सर्वसामान्य जनतेला वेळ देऊन त्यांची भेट घेतो. त्यांच्या समस्या समजावून घेत असतो. त्यावर प्राधान्याने उपाययोजना करणे, समस्यांची सोडवणूक करण्यासाठी मी प्रयत्नशील राहतो. आज सोलापूर जिल्हा दौऱ्यावर असताना शासकीय विश्रामगृह येथेही मी तसेच धनगर आरक्षणासंदर्भातील कृती समितीच्या सदस्यांना वेळ दिली, त्यांचे निवेदन घेत त्यांच्याशी सकारात्मक संवाद साधला. मात्र अनपेक्षितपणे जो काही अनुचित प्रकार झाला, यामुळे एकप्रकारे समाजात चुकीचा संदेश जाऊ नये एवढी भूमिका माझी आहे.

भंडारा उधळणे ही कृती चुकीची नाही, कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया येणे स्वाभाविक आहे, पण पवित्र भंडाऱ्याची माझ्यावर उधळण केल्याचा मला आनंदच झाला. त्यामुळेच भंडारा उधळणाऱ्यांवर कोणतीही कारवाई करू नये, गुन्हे दाखल करू नयेत, असे आदेश मी दिल्याचे असे विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय प्रलंबित असला तरी सरकारने त्यांना विविध योजनांच्या माध्यमातून सहकार्य केले आहे. पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून मेंढी शेळी सहकार विकास महामंडळ स्थापन करून अर्थसहाय्य करण्याची भूमिका सरकारने घेतली असल्याकडे त्यांनी माध्यमांचे लक्ष वेधले.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !