लाभार्थीपर्यत योजना पोहचणे यातच खरा सामाजिक भाव - सौ. धनश्री विखे
◻️ राहुरी, पाथर्डी, नेवासा तालुक्यातील सुमारे १५० दिव्यांग व्यक्तीना मोफत सहाय्यक साधनाचे वितरण
संगमनेर LlVE (नगर) | शासनाच्या योजनेचा लाभ लाभार्थ्यापर्यत पोहचला तरच योजनेतील सामाजिक भाव अधिक ठळकपणे समोर येत असल्याचे प्रतिपादन रणरागिणी महीला मंडळाच्या अध्यक्षा सौ. धनश्री विखे पाटील यांनी केले.
समाज कल्याण विभाग पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौडेशन आणि जिल्हा पुनर्वसन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने सिपडाच्या अंतर्गत राहुरी पाथर्डी नेवासा तालुक्यातील सुमारे १५० दिव्यांग व्यक्तीना मोफत सहाय्यक साधनाचे वितरण करण्यात आले याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी सुहास मापारी, समग्र शिक्षण विभागाच्या जिल्हा समन्वयक सौ. श्रध्दा मोरे, प्रा. सौ. आसावरी झपके यांच्यासह सर्व लाभार्थी आणि पालक कार्यक्रमास उपस्थित होते.
आपल्या भाषणात सौ. धनश्री विखे म्हणाल्या की,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व समाज घटकांसाठी निर्णय करताना समाजातील दुर्लक्षित राहीलेल्या घटकांसाठी सुध्दा योजनेची निर्मिती केली. आज देशातील दिव्यांग व्यक्तीनाही सहाय्यक साधनांचे वितरण झाल्याने नवा आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सरकारच्या योजना जाहीर होतात. पण त्याचा लाभ लाभार्थीना मिळणे अत्यंत महत्त्वाचे असते. खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी यासाठी पुढाकार घेतल्यामुळे जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना योजनेचा लाभ मिळू शकला. आज या योजनेच्या अंमलबजावणीत जिल्हा अग्रेसर असल्याचे त्यांनी सांगितले. मोदीजींचा सबका साथ सबका विकास हा मंत्र योजनेच्या माध्यमातून प्रत्यक्ष कृतीत उतरला असल्याकडे त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.
समाजातील आशा घटकासाठी काम करण्यासाठी स्पेशल आॅल्मपिक संघटनाही आता जिल्ह्यात पुढाकार घेणार आहे. या संघटनेच्या माध्यमातून गरजू व्यक्तिपर्यत पोहचण्याचा निश्चित प्रयत्न करणार असल्याची ग्वाही सौ. विखे पाटील यांनी दिली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लाभार्थीना सहायक साधनांचे वितरण करण्यात आले.