उंबरी बाळापूर येथे २० गुंठे ऊस जळून खाक
◻️ शेतकऱ्यांचे तब्बल १ लाख रुपयांचे अर्थिक नुकसान
◻️ तरुणांच्या प्रसंगावधानामुळे टळली मोठी वित्तहानी
संगमनेर LlVE | सर्वत्र दिपावली निमित्त आनंद उत्सवाचे वातावरण असताना संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर येथील शेतकरी विलास बाळासाहेब भुसाळ यांचा तब्बल २० गुंठे ऊस जळून खाक झाला आहे. यामुळे भुसाळ यांचे अंदाजे १ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
याबाबत स्थानिक नागरिकांनकडून समजलेली माहिती अशी की, घोलप वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत गट नंबर ५३०/२ मध्ये विलास बाळासाहेब भुसाळ यांचे ऊसाचे क्षेत्र आहे. रविवारी सकाळी सर्वत्र दिपावलीची धामधूम सुरू होती. अचानक पणे दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास भुसाळ यांच्या ऊसाच्या शेतीतून गेलेली महावितरणची विजेची तार तुटून खाली पडली. त्यामुळे या ऊस क्षेत्राला आग लागली होती.
आगीचे व धुराचे लोळ हवेत दिसू लागल्याने माजी ग्रामपंचायत सदस्य विजय शेळके, संदीप थोरात, किसन खेमनर, संतोष सांबरे, सचिन भुसाळ, मदन भुसाळ, प्रशांत शेळके, भगवान मैड, निलेश वाघमारे, मच्छिद्रं वाघमारे, कैलास भुसाळ, गोकुळ खेमनर, विशाल उंबरकर, लहाणू डोखे, सोमनाथ भुसाळ, संपत भुसाळ आदि सह स्थानिकानी घटनास्थळी धाव घेत शर्थीचे प्रयत्न करत ही आग विझवण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे परिसरातील ऊस तसेच इतर शेती पिकाची मोठी वित्तहानी टळली आहे.
या घटनेची माहिती मिळताचं महावितरणचे कर्मचारी अजय गिते, किरण उंबरकर, एकनाथ खेमनर यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आहे. तसेच कामगार तलाठी यांना याबाबत माहिती देण्यात आली असून या घटनेचा ते उद्या पंचनामा करणार असल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे.
दरम्यान ऐन सणासुदीच्या काळात शेतकरी विलास भुसाळ यांचे मोठे अर्थिक नुकसान झाले असून त्यांना अर्थिक भरपाई मिळावी अशी मागणी स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे.