मी नव्हे तर, लोकचं म्हणतात ‘फोडणवीस’ - उध्दव ठाकरे
◻️ संगमनेर व अकोले येथील जनसंवाद मेळाव्यात उध्दव ठाकरे यांची बोचरी टीका
संगमनेर LIVE | अशोक चव्हाण अवकाळी पावसासारखे भाजपात गेले. त्यामुळे लगेच त्यांना आज राज्यसभेची उमेदवारी मिळाली. मोदींनी ज्यांना नावं ठेवली ते आता पवित्र झाले असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मोदींवर टीका केली तसंच देवेंद्र फडणवीस यांच्यावरही उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा जोरदार टीका केली.
शिवसेनेचे आमदार मिंधे गटात गेले आहेत म्हणून त्यांना निधी. आमच्या आमदारांना निधी नाही. असा भेदभाव मी कधी मुख्यमंत्री असताना केला नव्हता. बाळासाहेबांनी हीच शिकवण आम्हाला दिली आहे असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. संगमनेर व अकोले या ठिकाणी झालेल्या जनसंवाद मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी सरकारवर जोरदार टीका केली.
यावेळी व्यासपीठावर खासदार संजय राऊत, माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख, मिलिंद नार्वेकर, वरुण सरदेसाई, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, राजेंद्र झावरे, रावसाहेब खेवरे आदि उपस्थित होते.
ठाकरे पुढे म्हणाले, शिवसेना प्रमुखांनी युतीचं सरकार असताना त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या मनोहर जोशींना आणि उपमुख्यमंत्री गोपनाथ मुंडेंना बोलवून घेतलं होतं. त्यांना सांगितलं पंत तुम्ही मुख्यमंत्री आहात आपलं सरकार आहे. काँग्रेसचे लोक आपल्या विरोधात लढतील, आंदोलनं करतील, मोर्चे काढतील. पण त्यांच्यावर लाठीमार करायचा नाही. ते काँग्रेसचे कार्यकर्ते असतील तरीही ते महाराष्ट्रातले तरुण आहेत त्यांना लुळं पांगळं करायचं नाही असं बाळासाहेबांनी मुख्यमंत्री असलेल्या मनोहर जोशींना आणि उपमुख्यमंत्री असलेल्या गोपीनाथ मुंडेंना तेव्हा बजावलं होतं. याचा साक्षीदार मी आहे असंही उद्धव ठाकरेंनी भाषणात सांगितलं.
“आपल्याकडून जे लढत आहेत, त्यांना मुदत दिली आहे. भाजपात या किंवा तुरुंगात जा. मी त्या अधिकाऱ्यांनाही सांगतो आहे. आमचं सरकार आलं तर तुम्हालाही तुरुंगात टाकेन. आज वाट्टेल तसे वागलात तरीही तुमचे दिवस भरलेत याद राखा. आपले गृहमंत्री आहेत, देवेंद्र त्यांचं नाव आता जनतेच ठेवलं आहे फोडणवीस. फडणवीस नाही फोडणवीस. हे आणि ते अमित शाह घरफोडे आहेत, कारण यांच्या घरात काही निर्माण झालं नाही म्हणून ते दुसऱ्यांची घरं फोडतात. काहीच आदर्शही यांच्यापुढे नाही. मोदींचं स्वप्न पूर्ण करायचं आहे की अशोक चव्हाण म्हणाले. मोदींनाही कळलं आहे आपलं स्वप्न हे भाजपावाले पूर्ण करु शकत नाहीत. म्हणून उपऱ्यांना घेतलं आहे.” अशी तोफ उद्धव ठाकरे यांनी डागली.
आपल्याकडचा गद्दारही तिकडे गेलाय तो झोपा काढयाला. हर्षवर्धन पाटलांना जशी शांत झोप लागते तसाच तो गद्दारही आहे असंही उद्धव ठाकरे म्हणाले. दिल्लीत येणाऱ्या अन्नदात्यांवर नादान केंद्र सरकार आपल्याला खाली खेचायचं आहे. इथे उन्हात आज माझ्यासमोर जे बसले आहेत ते शिवरायांचे मावळे आहेत. मी तुमची लढाई लढायला मी उतरलो आहे असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले आहेत.
दरम्यान यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.