ध्येयवादी व्यक्तिमत्व - गणेश लेंडे
भारत देश हा खेड्यांमध्ये पसरलेला आहे. म्हणूनचं महात्मा गांधींनी देखील ’खेड्यांकडे चला' असा संदेश दिला. निसर्ग, रूढी - परंपरा, चालीरिती, विविध समुदाय यांची खरी ओळख येथेच पाहायला मिळते.
नव्या पिढीला आजही शहरी लोक आवर्जुन खेड्यांमध्ये नेतात. आता ही खेडी झपाट्याने समृद्ध होत आहे. याचे कारण म्हणजे सत्तेचे विकेंद्रीकरण. येथूनच अनेकांच्या जीवनातील राजकारणाचा श्रीगणेशा झालाय. अशीच वाटचाल करत असलेले एक ध्येयवादी व्यक्तिमत्व म्हणजे गणेश लेंडे.
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील खंदरमाळ या खेडेगावाला नवी ओळख देण्यात विद्यमान गावकारभारी (सरपंच) गणेश लेंडे यांचा मोठा वाटा राहिला आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ध्येय धोरणे ठरलेले असतात. याच धर्तीवर त्यांनी गावाला नवीन प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला आहे.
मुळात या भागाची दुष्काळजन्य म्हणून ओळख आहे. म्हणूनच संघर्षाचे बाळकडू लहानपणापासून मिळत आलं आहे. यातूनच गावातील प्रत्येक घटकाला न्याय मिळेल, मुलभूत सुविधा मिळाव्यात म्हणून सदोदित प्रयत्न करून पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण याला सर्वोच्च प्राधान्य देत निकराने सोडवण्याचा प्रयत्न केला आहे.
गावची सरपंच पदाची मोठी जबाबदारी असल्याने अपेक्षाही तेवढ्याच असतात. त्यानुसारच त्यांनी आपल्या कामाची पद्धत विकसित केली आहे. यामुळेच सर्वसामान्य नागरिकांना हक्काचा माणूस वाटतोय. राज्याचे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात साहेब, माजी जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना कायम राजकारणापेक्षा समाजकारणाला वरचे स्थान देत आहे.
आज गावासह पठारभागात कोणताही कार्यक्रम असला की तो आपला समजून ते तन मन धनाने कार्यरत असतात. याचबरोबर शिक्षणातून नक्कीच पुढे जाता येते यावर त्यांचा दृढ विश्वास असल्याने शैक्षणिक बाबीला ते न्याय देत आले आहे. धार्मिक कार्यक्रम असले तरी त्यांचा हिरीरीने सहभाग असतो. यावरूनच प्रत्येक क्षेत्रात स्वतःला झोकून देत काम करणे ही वेगळी पद्धत लोकांनाही खूप भावत आहे.
मैत्री आणि मदत या दोन गोष्टींनाही तितक्याच तोलामोलाने निभावत असतात. कधीही कुणावर काही बाका प्रसंग आला तर पहिल्यांदा ते मदतीसाठी हजर असतात. आजकाल साधे एकमेकांना खुशाली विचारायला कुणाला वेळ नाही, इतके प्रत्येकजण आपापल्या कामात व्यस्त झालेले आहे.
अशाही परिस्थितीत गणेश लेंडे यांनी तसूभरही कमतरता ठेवलेली नाही. मैत्री आणि मदत सदैव आपल्या सोबत ठेवूनच ते वाटचाल करत आहे. या सर्व गोष्टी करत असताना कौटुंबिक जबाबदारीही तितकीच महत्वाची असल्याने ती देखील यशस्वीरित्या निभावत आहे.
आज ते आपल्या व्यवसायात उत्तुंग शिखरावर पोहोचले असून त्यातून मोठा गोतावळा तयार केला आहे. हिच खऱ्याअर्थाने त्यांच्या यशस्वी जीवनाची पावती ठरत आहे. त्यांचा जन्मदिवस असून, त्यानिमित्ताने ही वाटचाल अशीच हिमालयाएवढी उंच होवो याच शुभेच्छा!
शब्दांकन :- माऊली लेंडे