सत्ताधार्यांना ४० वर्षे दिले, मला फक्त पाच वर्षे द्या! - अमोल खताळ
◻️ महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांना गावागावात मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
◻️ संगमनेर विधानसभेची निवडणूक ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती
◻️ महायुती सरकारच्या माध्यमातून संगमनेर तालुक्याला ६० कोटी पेक्षा अधिक निधी
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यामध्ये असणाऱ्या दहशतीचा बिमोड करण्याचे मतदार संघातील जनतेने ठरविले असून ही निवडणूक जनतेने हातात घेतली आहे. त्यामुळे या वेळेची विधानसभेची निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी होणार असल्याने आपण जनशक्तीच्या जोरावरती विधान सभेची निवडणूक जिंकणार असल्याचा ठाम विश्वास महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांनी व्यक्त केला.
संगमनेर विधानसभा मतदारसंघातील महायुती उमेदवार अमोल खताळ यांनी संगमनेर खुर्द जिल्हापरिषद गटातील संगमनेर खुर्द, वैदुवाडी, खांडगाव, कौठे धांदरफळ, सांगवी, निमगाव बु।।, मेंगाळवाडी, सावरचोळ, शिरसगाव, धूपे, नांदुरी दुमाला, मिर्झापूर, गणेशवाडी व झोळे या गावातील मतदारांच्या भेटी घेतल्या. यावेळी त्यांच्या समवेत शिवसेनेचे तालुकाप्रमुख रामभाऊ राहणे, रमेश काळे, भाजप ज्येष्ठ नेते दादाभाऊ गुंजाळ, भाजप माजी शहराध्यक्ष राजेंद्र सांगळे, गोपीनाथ रुपवते यांच्यासह अनेक मान्यवरांसह तरुण वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता.
यावेळी अमोल खताळ म्हणाले की, सत्ताधार्यांना ४० वर्षे दिले मला फक्त पाच वर्षे द्या, मी या तालुक्याचा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून नक्कीच काय पालट केल्याशिवाय राहणार नाही. असा विश्वास करत ते म्हणाले की, प्रत्येक गावामध्ये मतदारांचा मला उस्फुर्त असा प्रतिसाद मिळत आहे. परंतु, काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांचे कार्यकर्ते कार्यकर्त्याना दमबाजी करत दादागिरी करतात ही निंदनीय गोष्ट आहे. जर तुम्ही लोकशाही मानत असाल तर अशी दादागिरी करणे योग्य नाही. असे अमोल खताळ म्हणाले.
संगमनेर तालुक्यात महायुती सरकारच्या माध्यमातून ६० कोटीच्या पुढे निधी मिळाला आहे. त्यामुळे तालुक्यातील जनतेने आता महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीमागे भक्कम उभे राहावे आणि कुठल्याही दादागिरीला आगर दडपशाहीला न घाबरतात निर्भयपणे मतदान करावे असे आवाहन संगमनेर विधानसभेतील महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांनी मतदारांना केले आहे.