पालकमंत्री हा मालक नसतो ; तुम्ही ३५ वर्षात काय केले ते सांगा?
◻️ बाळासाहेब थोरात यांची विखे पाटील यांच्यावर बोचरी टिका
◻️ संगमनेर तालुका कुणाच्या वाटेला जात नाही आणि कुणी आमच्या वाटेला गेले तर सोडत नाही
संगमनेर LIVE | जनतेच्या प्रेमामुळे राज्यात आणि देशात काम करण्याची संधी मिळाली. या संधीचा उपयोग तालुक्याच्या विकासासाठी केला. निळवंडे धरण व कालवे पूर्ण करून पाणी दिले. ज्या लोकांनी अडथळे निर्माण करणे ते इथे येऊन विकासाच्या बाता मारत आहेत. तुम्ही ३५ वर्षात काय केले हे अगोदर सांगा. तुमचे खोटे बोलणे संपूर्ण राज्याने पाहिले असून मागील अडीच वर्षात तुम्ही तालुक्याचा तुम्ही छळ केला. पालकमंत्री हा मालक नसतो असे सांगताना तुमची दडपशाही इकडे चालणार नाही असा इशारा काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी दिला.
संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी सिताराम पावसे होते. व्यासपीठावर डॉ जयश्रीताई थोरात, रणजितसिंह देशमुख, रामदास वाघ, गणपतराव सांगळे, रमेश गुंजाळ, डॉ. प्रमोद पावसे, नवनाथ आरगडे, शिवसेनेचे संजय फड, अशोक सातपुते, संतोष मांडेकर, सौ. अर्चनाताई बालोडे, कैलास वाकचौरे, दिलीप साळगट आदींसह महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, संगमनेरच्या जनतेने कायम प्रेम केले म्हणून राज्यात काम करण्याची संधी मिळाली. राज्यामध्ये महाविकास आघाडीच्या समन्वयाची मोठी जबाबदारी होती. मी राज्यभर फिरत होतो मतदारसंघ कार्यकर्त्यांनी सांभाळला. ज्यांना चाळीस वर्षात त्यांचा रस्ता नीट करता आला नाही. ते इकडे येऊन विकासाच्या गप्पा मारत आहेत. तुमचे वडील इकडे खासदार होते. तुम्ही ३५ वर्षात काय केले हे पहिले सांगा
इकडे येऊन वाईट बोलले. संगमनेर तालुका कुणाच्या वाटेला जात नाही आणि कुणी आमच्या वाटेला गेले तर सोडत नाही. धांदरफळच्या सभेत वाईट बोलणाऱ्याला प्रोत्साहन तुम्ही दिले. ती घटना अत्यंत दुर्दैवी होती. अवघ्या दहा मिनिटात संगमनेर तालुका पेटून उठला. त्यावेळेस तुम्ही कुपाटीने पळाले. हे टायगर बिबट्या वगैरे काहीच नाही. बिबट्या म्हणून बिबट्याचा अपमान करू नका अशी बोचरी टिका केली.
तालुक्यातील विकास थांबवण्यासाठी खडी क्रेशर तुम्ही बंद केले. रस्त्यांची कामे बंद पाडली. हजारो मजूर रस्त्यावर आणले .अनेक लोकांवर विनाकारण खोट्या केसेस दाखल केल्या. आपल्या येथील काही लोक त्यांना इकडे आमंत्रण देतात. विरोधक यामागे होते. विरोधकांचे आपण सन्मान केला पण दहशतवाद इकडे बोलावणे हे अत्यंत चुकीचे आहे म्हणून त्यांचा हल्ला आपण परतू लावलाच पण राहत्या मध्ये जाऊन या पण दुरुस्त करणार आहोत.
आपल्या तालुक्यात प्रेम आणि सद्भावना आहे. मला सर्व राज्य ओळखते आहे. मात्र त्यांचा खोटेपणा संपूर्ण राज्याने पाहिला असल्याचेही ते म्हणाले
डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, आमदार बाळासाहेब थोरात हे राज्यात काम करतात. मी तालुक्यात जनतेत फिरले. मी काय चूक केली, माझ्याविरुद्ध बोलले. त्यामुळे संपूर्ण तालुका पेटून उठला. यात माझे भाऊ माझ्या मागे उभा राहिले. तर त्यांच्यावर ३०७ चे गुन्हे दाखल केले. हा कुठला न्याय आहे, मी आठ तास पोलीस स्टेशन बाहेर उभी होती. मात्र माझी केस घेतली गेली नाही. उलट माझ्यावरच केस टाकली. ही दडपशाही आपण हे सहन करायचे नाही. सर्वांनी वीस तारखेला एकजुटीने मोठ्या मताधिक्याने आमदार थोरात यांना विजयी करा असे आवाहन त्यांनी केले.