अखेर.. काँग्रेस शिष्टमंडळाच्या पाठपुराव्याला यश!
◻️ संगमनेर तालुक्यातील प्रलंबित योजनांचे ५ कोटी ९६ लाख ६५ हजार बॅकेत वर्ग
◻️ संजय गांधी निराधार योजनेसह इतर योजनांमधील १८ हजार २७४ पात्र लाभार्थ्याना होणार फायदा
संगमनेर LIVE | काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली यशोधन कार्यालयाच्या माध्यमातून विविध गावांमधील वाडीवस्त्यावरील योग्य व पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळवून दिला जात आहे. मात्र अनेक दिवसांपासून हे अनुदान रखडवले गेले होते.
याबाबत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी २३ डिसेंबर रोजी प्रशासनाकडे तातडीने प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्याची विनंती केल्यानंतर आज शासनाने १८ हजार २७४ लाभार्थ्याच्या बँक खात्यावर ५ कोटी ९६ लाख ६५ हजार रुपये जमा केले आहे.
संगमनेर तालुका हा विस्ताराने मोठा असूनही माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रत्येक गावात वाडी वस्तीवर विकासाच्या योजना राबवल्या आहेत. तसेच योग्य लाभार्थ्याना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून दिला आहे. मात्र मागील अनेक दिवसांपासून संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी निराधार योजना, श्रावणबाळ वृद्ध काळ योजना यामधील अनेक लाभार्थ्याचे अनुदान राजकीय हेतू ठेवून जाणीवपूर्वक रखडले गेले होते.
याबाबत लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी वेळोवेळी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा केला यानंतर प्रशासनाने अनुदान देण्याचे मान्य केले. परंतु दिवाळीनंतर हे अनुदान मुद्दाम रखडून ठेवल्याने काँग्रेस शिष्टमंडळाने सौ. दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली २३ डिसेंबर २०२४ रोजी प्रांताधिकारी कार्यालय येथे निवेदन देऊन सर्व प्रकरणे तातडीने मार्गी लावावी तसेच लाभार्थ्यांना त्यांचे अनुदान द्यावे अशी आग्रही मागणी केली. याचबरोबर हे अनुदान तातडीने जमा न झाल्यास मोठे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
या मागणीची प्रशासनाने दखल घेऊन संजय गांधी निराधार योजनेचे ६२८० लाभार्थ्यांना २ कोटी ६१ ला ७४ हजार रुपये, श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत ५६७६ लाभार्थ्यांना १ कोटी ६५ लाख ७२ हजार रुपये, तर श्रावण बाळ गट निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत ४४३९ लाभार्थ्यांना १ कोटी १३ लाख ५ हजार रुपये, याचबरोबर अनुसूचित जाती जमाती मधील १८७९ लाभार्थ्यांना २० लाख १३ हजार रुपये असे एकूण ५ कोटी ९६ लाख रुपये लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर वर्ग होणार आहे.
दरम्यान संजय गांधी निराधार योजनेसह इतर योजनांमधील पात्र लाभार्थ्याना हे अनुदान मिळवे यासाठी काँग्रेस शिष्टमंडळांनी केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.