माजी मंत्री बाळासाहेब थोरात भगवान महादेवाच्या चरणी नतमस्तक!
◻️ शिवरात्रीनिमित्त खांडेश्वर व रामेश्वर येथे केली पूजा
◻️भारतीय संस्कृतीत शिवरात्रीचे मोठे महत्त्व - बाळासाहेब थोरात
संगमनेर LIVE | संपूर्ण देशामध्ये शिवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात सुरू असून प्रयागराज येथे महा कुंभमेळा सुरू आहे. या शुभ मुहूर्तावर लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी खांडेश्वर व रामेश्वर येथे दर्शन घेऊन पूजन केले. याचबरोबर शिवरात्री उत्सव हा भारतीय संस्कृतीत मोठा असून यातून ऊर्जा आणि अध्यात्मिक उन्नती मिळत असल्याची भावना व्यक्त केली.
शिवरात्रीनिमित्त खांडेश्वर देवस्थान खांडगाव रामेश्वर देवस्थान धांदरफळ बुद्रुक व निझरनेश्वर देवस्थान कोकणगाव येथे लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी महादेवाची पूजा केली. याप्रसंगी समवेत लहानभाऊ गुंजाळ, ॲड. मधुकर गुंजाळ, ॲड. नानासाहेब शिंदे, रमेश गुंजाळ, सोमनाथ गुंजाळ, सौ अर्चनाताई बालोडे, बाळासाहेब देशमाने, रामहरी कातोरे, अनिल काळे, दत्ता कासार आदींसह कोकणगाव, खांडगाव, धांदरफळ येथील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते खांडगाव येथे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेच्या वतीने डिजिटल दानपेटीचा शुभारंभ करण्यात आला. तर, रामेश्वर देवस्थान येथे थोरात यांच्या पाठपुराव्यातून मिळालेल्या दहा लाख रुपये निधीतून विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, प्रयागराज मध्ये मोठा महा कुंभ सुरू आहे. महाराष्ट्रातील लाखो भाविक या ठिकाणी जाऊन अध्यात्मिक ऊर्जा घेऊन आले आहेत.
महाशिवरात्रीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात मोठा आध्यात्मिक उत्सव असून यामधून प्रत्येकाला ऊर्जा आणि अध्यात्मिक उन्नती मिळते. शिवरात्रीच्या दिवशी शिवाचे प्रकट स्वरूप प्राप्त होत असल्याने मानवातील विकार नष्ट करून सत्य, निष्ठा आणि संयम हे अधिक मजबूत करण्यासाठी प्रत्येकाला शक्ती मिळत असते. या निमित्ताने महाराष्ट्रातील तमाम नागरिक युवक व महिला यांना निरोगी आयुष्य मिळावे अशी प्रार्थना त्यांनी केली.
महादेव मंदिरे गजबजली..
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली पर्यटन विभागाच्या माध्यमातून मोठा निधी मिळून संगमनेर तालुक्यातील खांडेश्वर, निझरनेश्वर, रामेश्वर व बाळेश्वर, अमृतेश्वर, दुधेश्वर येथील देवस्थान विकसित करण्यात आले आहे. सततच्या विकास कामांमधून हे सर्व तीर्थक्षेत्र विकसित झाल्याने भाविकांची मोठी गर्दी सर्व ठिकाणी होती. तर कारखाना कार्यस्थळावरील अमृतेश्वर मंदिरातही संगमनेर शहरासह परिसरातील नागरिकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे ‘हर हर महादेव’ हा जयघोष सर्वत्र दुमदुमत होता.