टँकरची मागणी होताच टँकर उपलब्ध करून द्या - आमदार अमोल खताळ

संगमनेर Live
0
टँकरची मागणी होताच टँकर उपलब्ध करून द्या - आमदार अमोल खताळ

◻️ संगमनेर येथे टंचाई आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना निर्देश

जनतेशी उद्धटपणे नव्हे तर, सौजन्याने वागण्याची अधिकाऱ्यांना तंबी

संगमनेर LIVE | पूर्वीच्या काळी टँकर मंजुरीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्याना होते. परंतु, पालकमंत्री विखे पाटील यांनी टँकर मंजुरीचे अधिकार आता प्रांताधिकारी यांना दिले आहेत. त्यामुळे तालुक्यातील ज्या गावातून पिण्याच्या पाण्याच्या टँकरची मागणी होईल. त्या गावासाठी तात्काळ टँकर उपलब्ध करून द्यावेत. असे स्पष्ट निर्देश आमदार अमोल खताळ यांनी दिले.

शहरातील यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवनामध्ये आमदार अमोल खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत टंचाई आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला तहसीलदार धीरज मांजरे, महावितरणचे कार्यकारी अभियंता अनिल थोरात, जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता रवींद्र महाजन, प्रभारी गटविकास अधिकारी राजेंद्र ठाकूर, मुख्याधिकारी रामदास कोकरे, तालुका कृषी अधिकारी श्रीमती रेजा बोडके, शिवसेनेचे रामभाऊ राहणे, राष्ट्रवादीचे कपिल पवार, आबासाहेब थोरात, वैभव लांडगे, दिनेश फटांगरे, कैलास कासार यांच्यासह अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार खताळ म्हणाले की, सध्या तालुक्यामध्ये पाणी टंचाई जाणविण्यास सुरुवात झालेली आहे. ज्या गावामध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्या गावातील लोकांना पिण्याच्या पाण्याचा टँकर कसा उपलब्ध करून देता याची ग्रामसेवक व तलाठी यांनी काळजी घ्यावी. पिण्याच्या पाण्याचे टँकर कुठल्या गावात कितीवेळा जातात? किती खेपा होतात? याबाबतचा अहवाल तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांना द्या, त्यांच्याकडून तो माझ्याकडे येईल. अधिकाऱ्यानी गावातील कुठल्याही राजकीय गटातटात अडकून न पडता पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्या. जर कोणी पिण्याच्या पाण्यामध्ये राजकारण करत असेल तर, त्यांच्या वर कारवाई करण्याचा इशारा यावेळी दिला. 

ते पुढे म्हणाले, जिथे पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्या ठिकाणचा सर्वे करून त्या गावासाठी किंवा वाडीसाठी तत्काळ टँकर उपलब्ध करून देता येईल याची दक्षता घ्यावी. ज्या गावात कमी लोकसंख्या आहे, त्या गावात लोकसंख्येचा निकष बाजूला ठेवून मदत करण्याची भावना ठेवा. तुम्हाला आमचे कार्यकर्ते जर त्रास देत असेल तर, त्यांची तक्रार माझ्याकडे करा. परंतु तुम्ही जर कामात हलगर्जीपणा केला तर, तुमच्यावर कारवाई केली जाईल. अशी तंबी आमदार खताळ यांनी अधिकाऱ्याना याप्रसंगी दिली.

मागील ४० वर्षापासून या तालुक्यातील जनतेला पाण्यासाठी संघर्ष करावा लागला आहे. आता तालुक्यात परिवर्तन झाले आहे. त्यामुळे आपला संघर्ष कमी होईल अशी अपेक्षा त्यांना आहे. त्यामुळे प्रत्येक अधिकाऱ्याने जनतेशी उद्धटपणे न वागता सौजन्याने वागा. जर काम होत नसेल तर, वरिष्ठांना सांगून बदली करून घ्या. विशेषतः महावितरणच्या संदर्भातील तक्रारी घेऊन आलेल्या जनतेच्या तक्रारी महावितरणचे उपअभियंता सोडवणे दूर परंतु, ते व्यवस्थित बोलत नाही. त्यांनी जर आपल्या कामात सुधारणा केली नाही. तर, त्यांची थेट गडचिरोलीला बदली केली जाईल. असा इशारा आमदार अमोल खताळ यांनी दिली.

संगमनेर तालुक्यात पूर्ण दाबाने विजेचा पुरवठा होत नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आबासाहेब थोरात, सरुनाथ उंबरकर, संदीप घुगे, रौफ शेख, महेश मांडेकर, गुलाब भोसले, वैभव लांडगे, रोहिदास गुंजाळ, अमोल दिघे, शरद गोर्डे, शंकर वाळे, गणेश सोनवणे, दिनेश फटांगरे, अण्णासाहेब ननावरे नामदेव घुले यांनी आमदार खताळ यांच्यासमोर महावितरण विभागाच्या तक्रारीचां पाढा वाचला. त्यानंतर लवकरचं या सर्व समस्यांवर तोडगा काढण्यासाठी बैठक आयोजित केली जाईल, असे आमदार अमोल खताळ यांनी सांगितले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !