सहकारी संस्थांमध्ये पठार भागाची नेहमीच मला साथ - बाळासाहेब थोरात

संगमनेर Live
0
सहकारी संस्थांमध्ये पठार भागाची नेहमीच मला साथ - बाळासाहेब थोरात

◻️ आंबी खालसा येथे स्नेहसंवाद मेळावा उत्साहात संपन्न 

◻️ विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर साखर कारखान्याचे काय होणार? अशा अफवा उठल्या

संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील सहकारी संस्थामध्ये पठारभागाने नेहमीच मला साथ दिली आहे. मग यामध्ये साखर कारखाना, दूध संघ, शेतकी संघ, जिल्हा परिषद असो वा जिल्हा बँक - प्रत्येक ठिकाणी मला मिळालेली साथ आजही मी विसरू शकत नाही. असे प्रतिपादन माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले.

संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा येथील लक्ष्मी मंगल कार्यालयात सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सभासद व युवक हितचिंतकांसाठी आयोजित स्नेहसंवाद मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी जेष्ठ संचालक पांडुरंग घुले, लक्ष्मण पावडे (गुरूजी), सभापती शंकर खेमनर, अजय फटांगरे, बबन कुर्‍हाडे, अरूण वाघ, विजय राहणे, सुरेश कान्होरे, दादापाटील आहेर, राजेंद्र आहेर, गणेश सुपेकर, दत्तात्रय गडगे, बापू जाधव, संपत आभाळे, ज्ञानदेव गडगे, गणेश सुपेकर,  सुनंदाताई भागवत, प्रियंका गडगे, भाग्यश्री नरवडे, प्रमोद कुरकुटे, दिनेश पावडे यांच्यासह आदी उपस्थित होते.

यावेळी थोरात म्हणाले कि, सहकार चळवळ केवळ उद्योगांची रचना नाही, तर ती शेतकर्‍यांची एकजूट आणि आत्मसम्मानाचे प्रतीक आहे. जेव्हा साखर कारखाना किंवा दूध संघाच्या माध्यमातून गावगावात प्रगती झाली, तेव्हा त्यामागे पठारभागाच्या माणसांचे योगदान ठळकपणे दिसून आले. आजही जेव्हा नव्या पिढीला सहकार क्षेत्रात काम करायची संधी मिळते, तेव्हा त्यामागे जुनी पिढी घडवून ठेवलेली परंपरा प्रेरणास्थान ठरते. 

दरम्यानच्या काळात विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर विरोधकांना असे वाटत होते की, आता साखर कारखान्याचे काय होणार? अशा अनेक अफवा देखील उठल्या होत्या. पण, अशा कठीण परिस्थित आपण कारखान्याची निवडणूक बिनविरोध केली. हे करणे सोपे नव्हते. मात्र, आपण ते करून दाखवले आहे. अनेकांनी मन मोठे करून आपले अर्ज मागे घेतले. याचा त्रासही मला खूप झाला आता आपण अतिशय चांगली घडी बसवली आहे.

राहुरी तालुक्यात मोठ्याप्रमाणात ऊस आहे. पण त्यांची काय अवस्था आहे हे आपण बघीतले पाहिजे. आपली संगमनेरची बाजारपेठ खूप मोठी आहे. हे सर्व चक्र कारखान्यामुळे फिरत असते. प्रत्येक वेळेस अचूक व योग्य निर्णय घेण्याचे काम आपण आत्तापर्यंत  केले आहे. यामुळे आपली प्रगती झाली आहे. बाहेरच्या शेतकर्‍यांचा विश्वास आपल्यावर आहे . म्हणून आपण ऊस आणत आहे. 

कारण त्या शेतकर्‍यांचा देखील विश्वास आपल्यावर आहे. आता ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी एकरी शंभर टनांपर्यंत ऊसाचे उत्पादन घेतले आहे. यामुळे शेतकर्‍यांना जास्तीत जास्त भाव देता येईल आणि आपल्याही बाहेरून ऊस आणण्याची गरज पडणार नाही. असेही शेवटी थोरात यांनी सांगितले आहे. दरम्यान कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजय फटांगरे यांनी केले सूत्रसंचालन बाळासाहेब कुऱ्हाडे तर आभार वकील सुहास आहेर यांनी मानले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !