छत्रपती शिवराय यांच्या विचारातून मोदी सरकारचे कार्य - आमदार शरद सोनवणे
◻️ विश्व हिंदू परिषदेचे शंकर गायकर यांच्या नर्मदा परिक्रमेचा यशस्वी सांगता सोहळा!
संगमनेर LIVE (अकोले) | छत्रपती शिवरायांच्या हिंदुत्ववादी विचारातून देशाचे पंतप्रधान मोदीजी काम करत आहे. यामागे शंकर गायकरांसारखे अनेक हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचे कार्य दडलेले आहे. असे गौरव उद्गार जुन्नर तालुक्याचे आमदार शरद सोनवणे यांनी काढले.
अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा येथे विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सहमंत्री व राष्ट्रीय प्रवक्ते शंकर भाऊराव गायकर यांनी द्वितीय नर्मदा माता पायी परिक्रमा यशस्वीरित्या पूर्ण केली. या पवित्र कार्याच्या सांगतेनिमित्त भव्य व भक्तिमय सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी महामंडलेश्वर बाळानंद महाराज कोंडार, अकोलेचे माजी आमदार वैभवराव पिचड, संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी सौ. नीलमताई खताळ, श्री क्षेत्र शिवशक्ती गड, तुळजवाडी ह.भ.प. संतोषानंद महाराज, पंचगंगा उद्योग समूहाचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे, भाजपा जिल्हा अध्यक्ष नितीन दिनकर, सिताराम भांगरे, भाऊसाहेब वाकचौरे, जिल्हा परिषद गटनेते जालिंदर वाकचौरे, मोहित ढमाले, संगमनेरचे उपविभागीय अधिकारी कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक मोहन बोरसे, भाजपा मंडल अध्यक्ष राहुल देशमुख, वाल्मिक नवले, बाळासाहेब सावंत, माजी उपसरपंच भारत आरोटे, ॲड. के. बी. हांडे, गोकुळ आरोटे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सचिन आरोटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
आमदार सोनवणे बोलताना म्हणाले की, छत्रपती शिवरायांनी तोरणा किल्ला घेतला त्यावेळेस मोगल सत्ता त्यांना हसत होत्या. परंतु स्वराज्य घडवलं आणि औरंगजेबाला याच मातीत गाडलं तसंच कार्य अटलजी आडवाणी यांनी रथयात्रा काढली त्यावेळेस ७० टक्के देश त्यांना हसत होता. मात्र त्या वेळी दिलेले आश्वासन मोदीजींनी पूर्ण केली. भव्य राम मंदिर उभारले. ३७० कलम हटवले. यासाठी अनेक हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी आपले जीवाचे बलिदान दिले. अशीच प्रेरणा शंकर गायकर यांनी आपल्या आयुष्यात जपली असे गौरव उद्गार काढले.
वैभव पिचड म्हणाले, पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी पंतप्रधान मोदीनी सिंदूर ऑपरेशन केले. धर्म विचारून मारणारे दहशतवादी आहेत. आज हिंदुत्व विचार पसरत आहे, यामागे शंकर गायकरांसारखे अनेक व्यक्तिमत्त्वांचा त्याग असल्याचे म्हटले.
सौ. निलम खताळ म्हणाल्या की, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही देव आणि धर्म वाचविण्यासाठी मतदान करा अशी विनंती केली आणि हा मुद्दा मतदारांना भावला. एक आदर्श शक्ती जीवनात पाठीमागे असते अशी नेहमी वाटत होत, ती आदर्श शक्ती आज समोर आल्याचे म्हटले.