◻️ डॉ. विखे पाटील यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत समस्या सर्व सोडविण्याची दिली ग्वाही
संगमनेर LIVE (लोणी) | राहाता तालुक्यातील खडकेवाके येथील फूड टेक्नॉलॉजी कॉलेज येथे डॉ. सुजय विखे पाटील यांचा जनता दरबार उत्साहात संपन्न झाला. या जनता दरबारासाठी अहिल्यानगर व परिसरातील विविध भागांतून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. नागरिकांनी आपापल्या समस्या मांडत त्यावर तोडगा काढण्यात यावा अशी मागणी केली.
दरबाराच्या प्रारंभी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साखर कारखान्याच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल नागरिकांच्या वतीने डॉ. सुजय विखे पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी डॉ. सुजय विखे पाटील यांनी नागरिकांशी थेट संवाद साधला. नागरिकांच्या विविध अडचणी व प्रश्न गांभीर्याने ऐकून घेतले आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांची योग्य ती दखल घेतली जाईल, तसेच समस्यांचे निराकरण करण्यासाठी तातडीने उपाययोजना केल्या जातील, अशी ग्वाही देखील दिली.
दरम्यान या जनता दरबारात ग्रामीण भागातील पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य व शिक्षण अशा विविध क्षेत्रातील प्रश्नांवर भर देण्यात आला. डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रशासनाशी समन्वय साधून हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपली भूमिका सकारात्मक राहील, असेही आश्वासन या दरम्यान उपस्थितांना दिले. या जनता दरबारामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे व विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.