शेतकऱ्यांना तातडीने युरिया उपलब्ध करून द्या!
◻️ कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन
संगमनेर LIVE | खरीप हंगाम सुरू झाल्याने तालुक्यातील व राज्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी युरियाची गरज आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करून बफर स्टॉक मधून ५० टक्के युरिया शेतकऱ्यांना तातडीने उपलब्ध करून द्यावी. अशी मागणी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
नुकतेच याबाबतचे पत्र सतीश खताळ व नामदेव शिंदे यांच्या माध्यमातून तालुका कृषी अधिकारी रजा बोडके यांनी स्वीकारले आहे.
दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, सध्या राज्यात सर्वत्र खरीप हंगाम सुरू आहे. पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. मोठ्या प्रमाणात पेरणी झालेली आहे. अशा काळामध्ये शेतकऱ्यांना युरियाची मोठी आवश्यकता आहे. मात्र सर्वत्र युरियाच्या टंचाईला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. संगमनेर तालुक्यातही सर्वत्र पेरण्या पूर्ण झाल्या असून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात युरिया गरज आहे. तालुक्यात शासनाने युरियाचा साठा करून ठेवला असल्याने शेतकऱ्यांना युरिया मिळण्यात मोठी अडचण होत आहे त्यामुळे शासनाकडे असलेल्या बफर स्टॉक मधून तातडीने ५० टक्के युरिया उपलब्ध करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.
दरम्यान कृषी अधिकारी रेजा बोडके यांनी तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.
अवकाळी पाऊस किंवा कोणतेही संकट आले की ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे कायम शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या पाठीशी उभे राहिले आहे. शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सातत्याने सरकार दरबारी मांडले असून न्याय मिळवून दिला आहे. युरियाची टंचाई जाणवत असताना थोरात यांच्या पुढाकारातून शेतकऱ्यांना युरिया उपलब्ध होणार असल्याने सर्व शेतकऱ्यांनी त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली.