संगमनेर तालुक्यातील विविध गावांमध्ये निळवंडे पाण्याचे जलपूजन
◻️ बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून तालुक्यात जलसमृद्धी - देशमुख
◻️ अंभोरे, पिंपारणे, पानोडी, मालुंजे येथे मोठ्या उत्साहात बंधाऱ्यांचे जलपूजन
संगमनेर LIVE | निळवंडे धरण व कालव्यांचे निर्माते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून आणि पाठपुराव्यामुळे झालेल्या डाव्या व उजव्या कालव्यातून आलेल्या पाण्यामुळे संगमनेर तालुक्यांमधील विविध गावांमधील बंधारे व गाव तळी भरण्यात आली आहे. त्यामुळे तालुक्यात जलसमृद्धी निर्माण झाली असल्याचे प्रतिपादन रणजितसिंह देशमुख यांनी केले.
संगमनेर तालुक्यातील अंभोरे, पानोडी, मालुंजे, पिंपारणे येथे राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांच्या हस्ते उजव्या कालव्यातून सोडण्यात आलेल्या पाण्याचे जलपूजन करण्यात आले. यावेळी संचालक सतीश वर्पे, गंगाराम वाकचौरे, अण्णा राहिंज, लहानभाऊ वर्पे, रवींद्र रोहम, अरुणराव देशमुख, शुभम काळे, दिनकर वाकचौरे, नवनीत देशमुख, राजेंद्र देशमुख, सरपंच नारायण मरभळ, अरुण राहिंज, रमेश राहिंज, बाबासाहेब राहिंज, संजय राहिज, कृष्णा रक्टे, भिमाजी राहिंज यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
उजव्या कालव्यातून कालव्या लगतच्या गावांना पाणी मिळावे याकरता सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून सुमारे दोन कोटी रुपयांचे पाईप देण्यात आले असून या माध्यमातून या गावांमधील बंधारे भरवण्यात आली आहे. या पाण्याने भरलेल्या बंधार्यांचे जलपूजन मोठ्या आनंदाने करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना रणजीतसिंह देशमुख म्हणाले की, विभागाच्या विकासाकरता पाणी हे अत्यंत महत्त्वाचे असून माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दुष्काळी भागाचा कायमचा पाणी प्रश्न सोडवावा याकरता निळवंडे धरण व कालवे पूर्ण केले. डावा आणि उजवा कालवा पूर्ण करण्यासाठी त्यांनी आमदारकी आणि मंत्रीपद पणाला लावले. मोठ्या कष्टातून हे ऐतिहासिक काम पूर्ण झाले आहे. त्यांच्या पाठपुराव्यामुळे आणि प्रयत्नातून आज दोन्हीही कालव्यांमधून पाणी सुरू आहे. यामुळे या भागातील बंधारे पाण्याने भरून घेण्यात आली आहे. यामुळे शेतीसाठी मोठा उपयोग होणार असून पाण्यामुळे जलसमृद्धी निर्माण झाली आहे.
माजी मंत्री थोरात यांच्या प्रयत्नातून दुष्काळी तालुक्याचे रूपांतर प्रगतशील तालुक्यामध्ये झाली असून कृषी दुग्ध शिक्षण सहकार अशा सर्व क्षेत्रांमध्ये संगमनेर तालुका हा राज्याला दिशादर्शक ठरत असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान अण्णासाहेब राहिजं यांनी देखील यावेळी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी गावोगावी मोठ्या उत्साहात जल पूजन करण्यात आले. यावेळी गावातील युवकांनी मिरवणूक काढून आनंद उत्सव साजरा केला.