संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे डॉ. तांबे आणि इंद्रजीत थोरात यांनी केले स्वागत
◻️ संगमनेर तालुक्यात प्रवेश करताचं दिंडीचे अभूतपूर्व स्वागत
◻️ माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून वारकऱ्यांसाठी सेवा सुविधा
संगमनेर LIVE | शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे आज अहिल्यानगर जिल्ह्यात आगमन झाले. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली अमृत उद्योग समूहाच्या वतीने वारकऱ्यांची सर्व सुविधा करण्यात आली असून रिमझिम पाऊस व अत्यंत भक्तीमय वातावरणात नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे व इंद्रजीत थोरात यांच्यासह गावकऱ्यांनी या पालखीचे अभूतपूर्व स्वागत आणि पूजन केले.
तालुक्यातील पारेगाव बुद्रुक येथे पंढरपूरसाठी निघालेल्या या पालखीचे सुमारे २० हजार वारकऱ्यांसमवेत आगमन झाले. याप्रसंगी निवृत्तीनाथ देवस्थानचे अध्यक्ष ॲड. सोमनाथ घोटेकर, अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक देविदास ढूमने, ॲड. त्र्यंबकराव गडाख, साहेबराव गडाख, दौलत गडाख, सोमनाथ गडाख, सचिन गडाख, बी. आर. चकोर, नवनाथ आरगडे, विजय राहणे आदींसह विविध पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
रिमझिम पावसात सुमारे २० हजार वारकरी या दिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत. मोठ्या आनंदाने व भक्तिभावाने या वारकऱ्यांनी हरिनामाचा गजर करत टाळ मृदुंगाच्या तालावर विविध अभंग गात जिल्ह्यात प्रवेश केला. अश्विनाथ विद्यालयाचे लेझीम पथक, पारंपारिक वाद्य व वेशभूषा करून गावकऱ्यांनी व विद्यार्थ्यानी या पालखीचे स्वागत केले.
डॉ. सुधीर तांबे म्हणाले की, संत निवृत्तीनाथ महाराज पालखीला मोठी परंपरा आहे. दरवर्षी ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे जिल्ह्यात प्रवेश करताना या पालखीचे स्वागत करतात. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. वारकरी संप्रदाय हा हजारो वर्षांपूर्वीच असून सर्वाना सोबत घेऊन जाणारा आहे. जात-पात धर्म हा कोणताही भेदभाव या संप्रदायात नाही, असे ते म्हणाले.
इंद्रजीत थोरात म्हणाले की, विठ्ठलाची पायी वारी ही महाराष्ट्राची मोठी संस्कृती असून यामध्ये गोरगरीब लहान थोर सर्व सहभागी झालेले असतात. भेदभाव विसरून एकत्र येऊन आनंदाने तल्लीन होऊन पांडुरंगाच्या चरणी लीन होतात. ही महाराष्ट्राची मोठी सांस्कृतिक व धार्मिक परंपरा असून यावर्षीही राज्यात भरपूर पाऊस पडू दे शेतकरी सुखी होऊ दे अशी प्रार्थना ही त्यांनी यावेळी केली.
दरम्यान वारकऱ्यांनी फुगडी खेळत डोक्यावर तुळशी वृंदावन घेत सर्वांच्या समवेत अभंग गायले. हरिनामाचा गजर आणि भक्तीमय वातावरणाने सर्व परिसर दुमदुमून गेला होता.
वारकऱ्यांसाठी सर्व सुविधा..
जिल्ह्यात प्रवेश करताना दरवर्षी काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित राहून पालखीचे स्वागत करतात. ते दिल्लीत असल्याने त्यांनी यावेळी त्यांनी दूरध्वनी वरून वारकरी व गावकरी यांच्याशी संवाद साधला. तसेच वारकऱ्यांसाठी एसएमबीटी सेवाभावी ट्रस्टच्या माध्यमातून ॲम्बुलन्स, अमृत उद्योग समूहातील संस्थांच्या माध्यमातून वारकऱ्यांसाठी राहण्याची सुविधा, पिण्याच्या पाण्याचा टँकर, दवाखाना, लाईट यांसह सर्व सुविधा उपलब्ध करून देताना संगमनेर तालुक्यातून दिंडी जाऊपर्यंत सर्व सुविधा पुरविण्याच्या सूचना यशोधन व अमृत उद्योग समूहाला दिल्या आहेत.