भंडारदरा धरणातून प्रवरा नदीपात्रात विसर्ग सुरु!
◻️ पर्यटकांचे आकर्षण असलेला ‘रंधा फॉल’ सुरु झाल्यामुळे पर्यटकांची गर्दी
संगमनेर LIVE (अकोले) | भंडारदरा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. आज शुक्रवारी भंडारदरा धरणाचा पाणीसाठा ७,४४१ दलघफू (६७.४१ टक्के) झाल्याने रंधा फॉल सुरु झाल्यामुळे पर्यटकांना पर्वणी सुरु झाली आहे.
भंडारदरा व निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पर्जन्यमान चांगल्या प्रकारे होत आहे. जलाशय परिचलन सूचीनुसार पाणीपातळी नियंत्रित ठेवणेकरीता भंडारदरा धरणातुन विद्युत गृह मधून ८४५ क्युसेक्स तर स्पील वे गेट मधून १०५८ क्युसेस ने पाणी सोडण्यात आले आहे. यावेळी एकूण १९०३ क्युसेस पाणी धरणातून विसर्ग सुरू आहे. पाण्याची आवक वाढल्यास अथवा कमी झाल्यास विसर्ग कमी जास्त होऊ शकतो. १५ जुलैपर्यंत ६५ टक्के लेव्हल कायम ठेवण्यात येणार आहे. असे शाखा अभियंता प्रवीण भांगरे यांनी सांगितले.
मागील दोन दिवस या दोन्ही पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण जास्त झाले होते. पंधरा दिवसांपासून पडत असलेला पाऊस आता काहीशी उघडीप देणार, असे वाटत असतानाच सकाळपासून पुन्हा एकदा पावसाने जोर वाढला आहे. मागील २४ तासात भंडारदरा ३० येथे मिमी, घाटघर ७४ मिमी, तर रतनवाडी येथे ६६ मिमी, पांजरे येथे ५८ मिमी पाऊसाची नोंद झाली आहे. तर सतत कोसळत असलेल्या पावसामुळे भंडारदरा धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे.
धरणातून पाणी सोडल्याने रंधा धबधबा प्रथमच वाहता झाला असल्यामुळे पर्यटकांना आनंद झाला आहे. तसेच भंडारदरा धरणातून सोडलेले पाणी निळवंडे धरणात जमा होत असून सध्या निळवंडे धरणातून शेती आवर्तनासाठी ९०० क्युसेस ने विसर्ग चालू आहे. त्यामुळे प्रवरा नदी पात्रात पाण्याची पातळी वाढते आहे. आढळा नदीवरील देवठाण धरण भरले असून आढळा नदी पात्रात पण पाण्याची पातळी वाढली असून हे पाणी प्रवरा नदीला मिळणार आहे.
मुळा परिसरात पावसाची तांडव वाढल्याने मुळा नदी दुथडी भरून वाहत आहे. मुळा धरणात चांगला पाणी साठा होत आहे. मात्र आदिवासी भागात भात खाचरे भरले असलेने रोपे पाणी खाली गेल्याने अवनीस उशिर होत आहे. तर, काही ठिकाणी शेतकऱ्यांचे बांध फुटले आहे. शेतकरी अडचणीत आला आहे. रोपे जर गेली तर भात लागवड होणार कसा प्रश्न निर्माण झाला आहे.