जयहिंद लोक चळवळीमुळे तरुण शेतकऱ्यांना प्रेरणा - कृषि मंत्री
◻️ नाशिक येथे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत राज्यातील १४ शेतकऱ्यांचा गौरव
◻️ माजी मंत्री थोरात यांची सभागृहातील अनुपस्थितीची हुरहूर लावणारी - मंत्री नाईक
संगमनेर LIVE | भारत हा शेतीप्रधान देश आहे. शेतीला व्यवसायिक रूप देणे गरजेचे असून याकरता माजी मंत्री बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली जयहिंद लोकचळवळीच्या माध्यमातून तरुण शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जाते. आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नातून शेतकऱ्यांना दिले जाणारे पुरस्कार हे युवकांसाठी प्रेरणादायी आहे. असे प्रतिपादन कृषि मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी केले. तर, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची सभागृहातील अनुपस्थिती ही संपूर्ण महाराष्ट्राला हुरहुर लावणारी असल्याचे राज्यमंत्री इंद्रानील नाईक यांनी यावेळी म्हटले.
जयहिंद लोकचळवळ यांच्यावतीने युवा शेतकरी मेळावा पुरस्कार कार्यक्रम २०२५ नाशिक येथील गुरुदक्षिणा सभागृह येथे संपन्न झाला. यावेळी आयोजित कार्यक्रमात कृषि मंत्री बोलत होते. कृषि राज्यमंत्री इंद्रानील नाईक, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार डॉ. शोभाताई बच्छाव, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार मनोज कायंदे, आमदार सत्यजीत तांबे, डॉ. शैलेश चव्हाण, विलासराव शिंदे, राजाराम चव्हाण, नारायण वाजे, उत्कर्षा रुपवते, कैलास भोसले, अविनाश चव्हाण, योगेश पाटील, नामदेव गुंजाळ आदी याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी आभासी पद्धतीने बोलताना कृषि मंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले की, आषाढी एकादशीनिमित्त मी पंढरपूरला असल्याने या कार्यक्रमासाठी प्रत्यक्ष उपस्थित राहु शकलो नाही. मात्र, आभासी पद्धतीने हा कार्यक्रम मी पाहत आहे. हा कार्यक्रम माझा घरचाच आहे. माजी मंत्री थोरात व माजी आमदार डॉ. तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली जयहिंद लोकचळवळ ही निरोगी समाज निर्मितीचे काम करत आहे. भारत हा कृषिप्रधान देश आहे. शेतीला व्यवसायिक रूप देणे गरजेचे आहे. याकरता युवकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीमध्ये नवनवीन प्रयोग केले पाहिजे. जय हिंद लोक चळवळीच्या माध्यमातून दिले जाणाऱ्या पुरस्कारातून राज्यभरातील तरुणांना नक्कीच शेती व्यवसायासाठी मोठी प्रेरणा मिळणार असल्याचे ते म्हणाले.
राज्यमंत्री इंद्रनील नाईक म्हणाले की, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा पराभव हा न उलगडणारे कोडे आहे. संपूर्ण राज्याला ते सभागृहात नाही याची खंत आहे. लोकनेते हे फक्त निवडणुकीपुरते नसून माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे सातत्याने लोकांसाठी काम करत आहे. कृषि क्षेत्रातील त्यांचे काम मोठे असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.
स्वर्गीय वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना त्यांनी जलसंधारण खात्यामध्ये महत्त्वपूर्ण काम केले. शेतीपूरक उद्योगांना चालना दिली. या क्षेत्रामध्ये तरुणांना आणण्यासाठी जय हिंद लोक चळवळीचा उपक्रम हा कौतुकास्पद असल्याचे म्हटले आहे.
बाळासाहेब थोरात म्हणाले की, डॉ. सुधीर तांबे तज्ज्ञ सर्जन आहेत. जनतेच्या आग्रहास्तव ते नगराध्यक्ष झाले. संगमनेर नगरपालिकेला दिशा दिली. पाच जिल्ह्यांमध्ये मोठा संपर्क त्यांनी निर्माण केला याचबरोबर संग्राम मतिमंद विद्यालयाच्या माध्यमातून अपंगांसाठी काम केले. जय हिंद युवा मंच युवकांची मोठी संघटना उभी केली. आज सत्यजीत तांबे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर या संघटनेचे काम सुरू असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमदार सत्यजीत तांबे यांनी केले. डॉ. अभयसिंह जोंधळे यांनी आभार मानले.
पुरस्कार प्राप्त युवा शेतकरी..
मिथिलेश हरिचंद्र देसाई, शुभम प्रकाश कोरडे, जगदीश दामोदर शेडगे, किसान हेल्प शेतकरी उत्पादक कंपनी रसलपुर, शिवानी महेश आजबे, समीर मोहनराव डोंबे खोर, वर्षा संजय मरकड, गोवर्धन दिलीप जाधव, अभय भालचंद्र पवार, अनंत भास्करराव मोरे, विजय लिमाजी पाटील, वसंतराव प्रेमराज चव्हाण, योगेश पद्माकर पाटील, आदिनाथ दत्तात्रय चव्हाण यांना शाल सन्मानचिन्ह, मानपत्र देऊन यावेळी गौरविण्यात आले.