माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी घेतली पवार आणि पिंजारी कुटुंबीयांची भेट
◻️ जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी सरकारदरबारी पाठपुरावा करण्याची ग्वाही
संगमनेर LIVE | भूमिगत गटार दुर्घटनेत मृत पावलेल्या अतुल पवार व जावेद पिंजारी यांच्या कुटुंबीयांची काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी भेट घेऊन सांत्वन केले आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करून या दोन्ही कुटुंबांना तातडीने जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ अशी ग्वाही दिली.
कोल्हेवाडी रोड येथे भूमिगत गटार दुर्घटनेमध्ये मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांची माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भेट घेतली. यावेळी समवेत माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, डॉ. जयश्री थोरात, सोमेश्वर दिवटे, विश्वासराव मुर्तडक, नितीन अभंग, निखिल पापडेजा, गणेश मादास, जावेद पठाण, लाला बेपारी, अंबादास आडेप, वैष्णव मुर्तडक, किशोर टोकसे यांच्यासह शहरातील विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी माजी मंत्री थोरात म्हणाले की, झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे. नगरपालिका प्रशासनाचा निष्काळजीपणा, तसेच काम अपूर्ण असताना आणि जोडणी अनाधिकृत जोडणी या युवकांना स्वच्छतेसाठी पाठवण्याची गरज नव्हती. झालेली घटना ही हृदय हेलकावणारी असून अतुलला वाचवण्यासाठी जावेद हा पुढे सरसावला. त्या दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. या दोन्ही कुटुंबीयांना शासन स्तरावरून जास्तीत जास्त मदत मिळून देण्यासाठी मुख्यमंत्री व सरकारकडे आपण पाठपुरावा करून यांना तातडीने मदत मिळवून देऊ असे ते म्हणाले.
डॉ. तांबे म्हणाले की, झालेली घटना ही अत्यंत वाईट आहे. यामध्ये नगरपालिका प्रशासनाचा निष्काळजीपणा आहे. काम अपूर्ण असताना ही जोडणी नकोच होते. झालेल्या घटनेचे राजकारण न करता माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून या कुटुंबांना जास्तीत जास्त मदत मिळून दिली जाईल.
याप्रसंगी डॉ. जयश्री थोरात यांनी दोन्ही कुटुंबीयांच्या महिलांचे सांत्वन केले.
दरम्यान यावेळी शहरातील कार्यकर्ते आणि परिसरातील नागरी, महिला, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.