नाथ सागर भरल्याचा मराठावाड्याला जेवढा तेवढाचं अहिल्यानगरला सुध्दा आनंद!
◻️ जलसंपदा मंत्री विखे पाटील यांनी जायकवाडी धरणातील पाण्याचे केले जलपूजन
◻️ धुळ्याहून सायकलवर नाथ सागर पाहायला आल्याच्या आठवणीने विखे पाटील भावुक
संगमनेर LIVE (लोणी) | नाथ सागर प्रकल्पाच्या पायाभरणी पासून ते ज्ञानेश्वर उद्यानाच्या निर्मीतीची वाटचाल, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या अमृत महोत्सवी वर्षाचा धरणावर झालेला सत्कार, या धरणाच्या निर्मितीत बहीणीला विस्थापीत व्हावे लागल्याच्या आठवणींना उजाळा देत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जायकवाडी धरणातून पाणी सोडण्याचा आनंदादायी क्षण अनुभवला!
अनेक वर्षाच्या कालखंडानंतर नाथसागर भरले याचा आनंद मंत्री विखे पाटील यांनी जलपूजन करून व्यक्त केला. धरणावर येवूनच त्यांनी नाथसागराची खणा नारळान ओटी भरून गोदामातेची आरती केली. सायरन वाजवून पाणी सोडण्याची औपचारिक प्रक्रीया पूर्ण केली. अनेक वर्षानंतर जुलै महीन्यातच नाथ भरण्याचा क्षण लाभक्षेत्राली यंदा अनुभवता आला आहे.
मराठावाड्याला जेवढा झाला तेवढाच तो अहिल्यानगरला सुध्दा आहे असे सांगून कधी काळी या धरणाच्या पाण्यावरून वादाचे प्रसंग आले. पण सर्व गोष्टीना निसर्ग हेच उत्तर असल्याचे सांगून मंत्री विखे पाटील म्हणाले की, स्व. शंकरराव चव्हाण यांनी अतिशय दूरदृष्टीतून या प्रकल्पाची उभारणी केली. देशाचे पंतप्रधान लाला बहादूर शास्त्री यांच्या हस्ते भूमीपूजन झाल्याच्या ऐतिहसिक आठवणी मनामध्ये घर करून असल्याचे त्यांनी सांगितले.
या धरणामध्ये माझ्या बहीणीला विस्थापीत व्हावे लागल्यानंतर खिर्डी गावाला भेट देण्याच्या प्रसंगाचे वर्णन सांगून, धुळे येथे महाविद्यालयात शिक्षण घेत होतो. तेव्हा सायकलवर नाथसागर पाहायला कसे आलो आणि जाताना बसवर सायकली टाकून कशा नेल्या हे सांगायला सुध्दा ते भाषणाच्या ओघात विसरले नाहीत.
पंतप्रधान इंदिरा गांधी याठिकाणी आल्या तेव्हा पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या अमृतमहोत्सवी सत्कार झाला. मुख्यमंत्री असलेले स्व. शंकरराव चव्हाण आणि तेव्हाचे पाटबंधारे मंत्री बी. जे. खताळ यांच्यासह अनेकांच्या असलेल्या उपस्थितीलाही त्यांनी उजाळा दिला.
भविष्यात पाण्याचे संघर्ष आपल्याला संपवायाचे आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा संकल्प महायुती सरकारने केला आहे. आता उल्हास खोऱ्यातील पाणी गोदावरीच्या तुटीच्या खोऱ्यात वळविण्यासाठी महायुती सरकारने आरखडा तयार केला असून त्यावर काम सुरू झाले. केवळ सर्व्हेक्षणासाठी ६० हजार कोटी रुपयांच्या निधीची तरदूत केली असून नदीजोड प्रकल्पाचे कार्यालय नासिक येथे सुरू होत असल्याची माहिती त्यांनी दिली.
पद्मभुषण डाॅ. बाळासाहेब विखे पाटील आणि गणपतराव देशमुख यांनी नदीजोड प्रकल्पाच्या मांडलेल्या संकल्पनेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला त्यामुळेच या प्रकल्पाचे काम वेगाने पुढे जात आहे. डाॅ. बाळासाहेब विखे पाटील आणि डॉ. गणपतराव देशमुख या दोघांचे स्वप्न पूर्ण करण्याचे दायित्व आपल्यावर सोपविले असल्याने ते पूर्ण करण्याची जबाबदारी मंत्री म्हणून घेतली असल्याची ग्वाही मंत्री विखे यांनी दिली.
या परीसारातील संत ज्ञानेश्वर उद्यानाचा विकास जलसंपदा विभागाच्या माध्यामातून करण्यात येणार असून अन्य काही प्रकल्प पर्यटकांसाठी सुरू करणार आहे.
राज्यातील धरणातून गाळ काढण्यासाठी स्वतंत्र धोरण घेण्यात येणार असून यामुळे पाण्याची पातळी वाढण्यास तसेच बॅकवाॅरचा फायदा अहील्यानगरच्या तालुक्यांना होईल. पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाण्याचा प्राधान्यक्रम कायम ठेवून यंदाच्या वर्षी आवर्तनाचे नियोजन झाले. उन्हाळ्यातही याचा फायदा झाल्याकडे मंत्री विखे पाटील यांनी सर्वाचै लक्ष वेधले.
आ. विलास बापू भुमरे यांनी नाथसागराचे जलपूजन करणारे पहिले जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे ठरले असल्याचे सांगितले. या भागातील ब्रम्हगव्हाण उपसा सिंचन योजनेला ३०२ कोटी रूपये मंजूर केल्याबद्दल त्यांनी आभार मानले.
याप्रसंगी आ. हिकमत उढाण आ.हविजयसिंह पंडीत, आ. रमेश बोरनारे, आ. विठ्ठलराव लंघे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मुख्य अभियंता अरूण नाईक, सुनंदा जगताप, मुख्य अभियंता राजीव मुंदडा, सभापती राजू भुमरे, नाथ संस्थानचे विश्वस्त दादापाटील बार्हे यांच्यासह महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी उपस्थित होते.
कार्यक्रम सुरू असताना शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने केलेल्या घोषणाबाजीची दखल घेवून मंत्री विखे पाटील यांनी त्यांच्या प्रतिनिधींनीना बोलावून घेत सभेच्या ठिकाणीच प्रश्नाबबात चर्चा केली आणि जिल्हाधिकरी स्वामी यांना सूचना दिल्या.