विविधतेतील एकता हिचं खरी भारताची ताकद - बाळासाहेब थोरात
◻️ अमृत उद्योग समूहात विविध ठिकाणी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा
संगमनेर LIVE | १८५७ च्या पहिल्या स्वातंत्र्य लढ्यापासून सातत्याने देशभक्तांनी केलेल्या संघर्ष, त्याग आणि आत्मबलिदानातूनच हे स्वातंत्र्य आपल्याला प्राप्त झाले आहे. भारतामध्ये विविध जाती धर्माचे लोक एकत्र राहत असून अनेक बोलीभाषा व वेशभूषा आहेत. विविधता हे वैशिष्ट्य असतानाही राष्ट्रीय एकात्मता व विविधता हीच खरी देशाची ताकद ठरली असल्याचे गौरवउद्गार कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्यावर अमृत उद्योग समूहाच्या वतीने आयोजित ७९ व्या ध्वजारोहणाच्या मुख्य कार्यक्रमात थोरात बोलत होते.
थोरात पुढे म्हणाले की, १९४२ साली महात्मा गांधीनी ‘चले जाव’ ची घोषणा करताच संपूर्ण देश स्वातंत्र्य चळवळीत उभा राहिला. राष्ट्रपिता महात्मा गांधी, पंडित नेहरू यांसह असंख्य महान नेत्यांनी तुरुंगवास सहन केला, यात आपले संगमनेरही मागे नव्हते. स्वातंत्र्य सेनानी तीर्थरूप भाऊसाहेब थोरात यांनीही वयाच्या १८ व्या वर्षी स्वातंत्र्यासाठी तुरुंगवास भोगत अखेरपर्यत संघर्ष केला.
आज त्या सर्व वीरांना स्मरून, त्यांच्या त्यागाची प्रेरणा घेऊन “स्वातंत्र्याचा हा अमूल्य वारसा सदैव जपावयाचा आहे. देशाची राज्यघटना या अत्यंत महत्त्वाची असून लोकशाही व राज्यघटना जपण्यासाठी प्रत्येकाने कटिबद्ध राहणे गरजेचे असून जगामध्ये आज मोठी अशांतता निर्माण झाली आहे. भारतामध्येही अनेक राज्यांमध्ये अशांतता आहे. आपल्याला हा देश एकसंघ ठेवायचा आहे. वेगवेगळी संस्कृती भाषा जरी असली तरी राष्ट्रीय एकात्मता ही आपली मोठी ताकद आहे.
अनेक शक्ती जातीभेदाच्या नावावर राजकारण करू पाहत आहेत. अशा प्रवृत्तीला वेळीच रोखणे गरजेचे आहे. हा देश लोकशाही स्वातंत्र्य आणि राज्यघटना टिकली पाहिजे या विचाराने प्रत्येकाने काम करावे असे आवाहन त्यांनी केले.
अमृत उद्योग समूहामधून सातत्याने गुणवत्ता पूर्ण काम होत असून सहकाराबरोबरच शिक्षणामधून मोठी क्रांती झाली आहे. अनेक विद्यार्थी मोठ्या पदांवर काम करत आहे की यशस्वी वाटचाल कायम जपताना युवकांनी तालुक्याचा लौकिक वाढवावा असे आवाहन त्यांनी केले.
डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या की, युवक हीच खरी देशाची संपत्ती असून प्रत्येकाने आपल्या क्षेत्रात पूर्ण कार्यक्षमतेने काम करावे. येणारा काळ हा भारताचा असून सर्वांना सोबत घेऊन जाणारी विकासाची वाटचाल आपल्या सर्वांना जोपासवायची आहे.
यावेळी कारखान्याचे सुरक्षा अधिकारी मोहन मस्के यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याच्या सुरक्षा विभाग व विविध महाविद्यालय व शाळांच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पाहुण्यांना मानवंदना दिली.