राष्ट्रीय कार्यक्रमप्रसंगी नागरिकांनी राष्ट्रध्वजाचा सन्मान राखावा!
◻️ अहिल्यानगर जिल्हा प्रशासनाचे आवाहन
संगमनेर LIVE (अहिल्यानगर) | प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन, इतर राष्ट्रीय कार्यक्रम व विशेष प्रसंगी राष्ट्रध्वजाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. नागरिकांनी राष्ट्रध्वजाचा सन्मान राखावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
विविध प्रसंगी राष्ट्रध्वजाचा वैयक्तिक वापर होत असतो. मात्र, कार्यक्रमानंतर काही ठिकाणी राष्ट्रध्वज जागोजागी पडलेले दिसतात, जे अत्यंत दुर्दैवी व अवमानकारक आहे. अशा प्रकारे राष्ट्रध्वजाची अवहेलना होऊ नये, यासाठी सर्वांनी दक्ष राहावे.
ध्वजसंहितेतील सर्व नियम व सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे अत्यावश्यक आहे. खराब किंवा माती लागलेले राष्ट्रध्वज गोणी किंवा कपड्यात व्यवस्थित बांधून, शिवून बंद करावेत. अशासकीय संस्था, संघटना व नागरिकांनी अशा राष्ट्रध्वज तहसील कार्यालयात सुपूर्द करावेत, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.