मालुंजे पाझर तलावात निळवंडे कालव्याचे पाणी दाखल!
◻️ युवानेते डॉ. विखे पाटील आणि आमदार खताळ यांच्या हस्ते जलपूजन संपन्न
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील मालुंजे येथे सर्वप्रथमच निळवंडे उजव्या कालव्याचे पाणी पाझर तलावात आले. त्या पाझर तलावातील पाण्याचे जलपूजन युवानेते डॉ. सुजय विखे पाटील व आमदार अमोल खताळ पाटील यांच्या हस्ते पार पडले.
तालुक्यातील कोळवाडे, अंभोरे, डिग्रस, मालुंजे, पानोडी या गावांमध्ये दुष्काळ पाचवीला पुंजलेला होता. या सर्वच गावांमध्ये शासनाचे पाण्याचे टँकर सुरू होते. मात्र राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून निळवंडे डावा आणि उजवा या दोन्ही कालव्यांचे कामे पूर्ण होऊन या वर्षी सर्वप्रथमच निळवंडे उजवा कालव्याला पाणी आले. त्यामुळे या भागातील जनतेची पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याची टंचाई दूर झाली आहे. निळवंडे उजव्या कालव्याचे पाणी मालुंजे गावच्या पाझर तलावात आले. त्यामुळे या भागात असणारे टँकर बंद झाले आहे. परिसरातील महिलांच्या डोक्यावरील हंडा खाली उतरला आहे. त्यामुळे परिसरातील महिला आणि शेतकऱ्यानी समाधान व्यक्त केले आहे.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ पाटील यांच्या माध्यमातून या पाझर तलावात पाणी आले आहे. त्यामुळे परिसरातील सर्वसामान्य जनता आनंदीत झाले आहे.
यावेळी डॉ. सुजय विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांची मिरवणूक काढण्यात आली होती. याप्रसंगी महायुतीचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यासह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मालुंजे गावामध्ये पिण्याला पाणी नव्हते. त्यामुळे महिलांना हंडाभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. परंतु, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ पाटील यांच्या माध्यमातून निळवंडे उजव्या कालव्याचे पाणी मालुंजेच्या पाझर तलावात सोडण्यात आले. त्यामुळे स्थानिकांनी आनंदोत्सव साजरा केला.