“तुमच्या विश्वासाचे सोने करण्यासाठी मी कटिबद्ध” - आमदार अमोल खताळ
◻️ संगमनेर तालुक्यातील १६० किमी पर्यतचे पानंद रस्ते सिमेंट कॉक्रिटचे होणार
◻️ राजापूर, जवळे कडलग, वडगाव लांडगा, कवठे धांदरफळ आदि गावांमध्ये विविध विकास कामांचा शुभारंभ
संगमनेर LIVE | “मायबाप जनतेने माझ्यासारख्या एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलावर विश्वास टाकून लोकप्रतिनिधित्वाची संधी दिली आहे. या संधीचे सोने करून तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. अशी ग्वाही आमदार अमोल खताळ यांनी दिली. केंद्र आणि राज्यातील महायुती सरकारच्या सहकार्यातून तालुक्याच्या सर्वागीण विकासाला गती दिली जात असून, निधीची कोणतीही कमतरता भासू देणार नसल्याचा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
संगमनेर तालुक्यातील राजापूर, जवळे कडलग, वडगाव लांडगा, कवठे धांदरफळ, पिंपळगाव कोझिरा, निमगाव बुद्रुक, पेमगिरी, मिर्झापूर, खांडगाव यांसह अनेक गावांमध्ये जिल्हा नियोजन आणि आमदार अमोल खताळ पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून मंजूर झालेल्या विविध विकास कामांचा नुकताच शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी स्थानिक महायुतीचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अडथळे न आणता पाठीशी उभे राहावे..
यावेळी बोलताना आमदार खताळ म्हणाले की, “संगमनेरकरांनी माझ्याकडून मोठ्या अपेक्षा बांधल्या आहेत आणि त्या अपेक्षांना तडा जाऊ नये यासाठी मी सातत्याने प्रयत्न करत आहे. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महायुती सरकारच्या माध्यमातून विकासकामे वेगाने होत आहेत.” ही विकास कामे होताना कोणीही अडथळे न आणता, फक्त तुम्ही सर्वजण माझ्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहनही त्यांनी ग्रामस्थांना केले.
१६० किमीचे पक्के रस्ते; लवकरच कॉक्रिटीकरण होणार..
आमदार खताळ यांनी ग्रामीण भागातील रस्त्यांच्या समस्येकडे लक्ष वेधले. ते म्हणाले, “ग्रामीण भागातील अनेक रस्ते वर्षानुवर्षे रखडले होते. मात्र पानंद रस्ते योजनेतून १६० ते ७० किलोमीटर पर्यतचे पक्के रस्ते मंजूर करून आणण्यात आले आहेत. हे सर्व रस्ते सिमेंट कॉक्रिटीकरण व्हावे यासाठी आपला आग्रह राहणार आहे. राज्यातील महायुती सरकार आणि जिल्हा नियोजन समितीतून मोठ्या प्रमाणावर निधी मिळवून तालुक्याच्या सर्वागीण विकासाला गती दिली जात आहे.”
ज्या रस्त्यांची सातबारा उताऱ्यावर नोंद नव्हती ते रस्ते नोंदीत घेण्याचे काम पूर्णत्वास जात असून, त्यातून गावागावात होणारे वादविवाद, भांडण-तंटे कमी होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
“संगमनेरचे नाव आता राज्याबरोबरच देश पातळीवर सन्मानाने घेतले जात आहे. तालुक्याच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये सर्वानी महायुतीच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहावे.” असे आवाहन आमदार अमोल खताळ यांनी केले.