बिबट्याच्या हल्ल्यात मुलीचा मृत्यू; कुटुंबाला विखे पाटीलांच्या प्रयत्नातून मदत
◻️ सौ. शालिनीताई विखे यांच्या हस्ते मदतीचा धनादेश सुपूर्द
संगमनेर LIVE (लोणी) | बिबट्याच्या हल्ल्यात मयत झालेल्या कु. नंदिनी प्रेमदास चव्हाण (रा. तळेगाव, ता. चाळीसगाव) या उस तोडणी कामगारांच्या मुलीवर बिबट्यांने कोपरगाव येथे हल्ला केला होता. यामध्ये ती मयत झाल्याने हिच्या वारसांना शासनाच्यावतीने तातडीची मदत म्हणून दहा लाखाचा धनादेश जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते देण्यात आला.
जलसंपदा मंत्री आणि पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी शासनाकडे विशेष प्रयत्न करून २५ लाख रकमेपैकी तातडीची मदत १० लाख रुपयाचा धनादेश वारसांना प्रदान केला. बुधवार दि. ५ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ७ ते ७:३० वाजेच्या सुमारास कु. नंदिनी प्रेमदास चव्हाण ही खेळत असताना तिच्यावर बिबट्याने हल्ला केला होता. यामध्ये तिचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
चव्हाण कुटुंब हे चाळीसगाव येथून ऊस तोडणीसाठी कोपरगांव येथे आले आहे. पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी शासनाच्या वतीने २५ लाख रुपयांची मदत जाहीर केली होती. त्यांनतर आज वनविभागाने तातडीची मदत म्हणून दहा लाखाचा धनादेश वारसदार प्रेमदास गोरख चव्हाण यांना जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी अहिल्यानगरचे सहाय्यक उपवन संरक्षक अधिकारी गणेश मिसाळ, वन्यजीव प्राणीमित्र विकास म्हस्के, वनरक्षक प्रतिक गजेवर उपस्थित होते.
बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी मंत्री विखे पाटील यांनी विशेष प्रयत्नातून जिल्ह्यासाठी आठ कोटी रुपये मंजूर केले असल्याची माहिती सौ. विखे पाटील यांनी देत असताना पालकांसह सर्वानीच बिबट्यांबाबत सतर्क रहावे असे आवाहन केले.