बिबट्याच्या वाढत्या संचारामुळे जिल्हापरिषद शाळांच्या वेळेत बदल करण्याचे निर्देश!
◻️ पालकमंत्री विखे पाटील यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना; विद्यार्थ्याच्या सुरक्षेला प्राधान्य द्या
संगमनेर LIVE | ग्रामीण भागात बिबट्यांचा संचार मोठ्या प्रमाणात वाढल्याने जिल्हा परिषदेच्या शाळांच्या वेळेत बदल करण्याची सूचना आपण जिल्हाधिकार्याना केली असल्याची माहीती जलसंपदा तथा पालक मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
संगमनेर तालुक्यातील डिग्रस येथील जिल्हा परिषदेच्या शाळा खोल्याचे उद्घघाटन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. आमदार अमोल खताळ, सरपंच अशोक खेमनर यांच्यासह ग्रामस्थ, महीला, युवक कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.
आपल्या भाषणात मंत्री विखे म्हणाले की, संपूर्ण जिल्ह्यात बिबट्यांकडून हल्ले होण्याच्या घटना वाढल्याचे गांभिर्य लक्षात घेवून जिल्हा परिषद तसेच ग्रामीण भागात असलेल्या अन्य शाळांच्या वेळामध्ये बदल करून विद्यार्थ्याना असलेला धोका दूर करण्याचा प्रयत्न आहे. अनेक विद्यार्थी लांबच्या अंतरावरून शाळेत एकटे येतात. सध्या अंधारही लवकर पडत असल्याने विद्यार्थ्याना संरक्षण देण्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समिती शिक्षक यांच्यावर असल्याचे विखे पाटील म्हणाले.
काही दिवस स्थानिक पातळीवर लांबच्या विद्यार्थ्यासाठी वेळप्रसंगी वाहनाची व्यवस्था तसेच ग्रामरक्षक दल स्थापन करण्याबातही पुढाकरा घेण्याचे आवाहन त्यांनी केले. शाळा इमारतीचे काम चांगले झाले असले तरी, एखादे विकास काम कमी करा विद्यार्थ्यासाठी स्वच्छता गृह बांधण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेण्याची सूचना केली. तालुक्यात विकास कामांची प्रक्रीया आमदार अमोल खताळ यांच्या माध्यमातून चांगल्या पध्दतीने सुरू असून तालुक्यात जनेतने केलेले परीवर्तन हे विकासासाठी केले आहे.
यापुर्वी तालुक्यातील बहुतांशी गावांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागले. १७० टॅकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा करावा लागत होता. मात्र, निळवंडे धरणाचे पाणी आल्याने जिरायती भागाला दिलासा मिळाला. डिग्रस गावाला निळवंडेच्या पाण्याचा लाभ कसा देता येईल यासाठी अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.
महायुती सरकार जनतेच्या हिताचे काम करीत आहे. प्रत्येक निर्णय लोकहीतासाठी होतो. अतिवृष्टीची सुमारे २३ कोटी रुपयांची मदत तालुक्याला मंजूर झाली असून, विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश महासत्ता बनत असून बिहार विधानसभेच्या निकालाने पुन्हा एकदा जनता विकासच्या बाजूने उभी राहात असल्याचे सिध्द झाले. मत चोरीचा आरोप करणाऱ्यांना मोठी चपराक बिहारच्या जनतेने दिली. ज्यांनी जनतेचा विश्वास गमावला त्या राहूल गांधीनी परदेशातच थांबावे आता काॅग्रेस पक्षाचे तिकीट घ्यायला कोणी तयार नसल्याचा टोला मंत्री विखे पाटील यांनी लगावला.
आमदार अमोल खताळ यांनी आपल्या भाषणात ४५ वर्ष जे प्रश्न सुटले नाहीत त्या प्रश्नांना प्राधान्याने सोडविण्याचे काम सुरू केले असल्याचे सांगितले. साकूर पठार भागाचा पाणी प्रश्न भोजापूर प्रमाणेच मार्गी लागेल. आज विकास कामांना निधी मंजूर करून आणण्याचे काम आपण करीत आहोत. चाळीस वर्षात निधी आणता आला नाही. ते मात्र आता खोटे श्रेय घेत असल्याची टिका त्यांनी केली.