संगमनेर औद्यगिक वसाहत निर्मितीसाठी पुढील आठवड्यात बैठक - मंत्री उदय सामंत
◻️ ज्येष्ठ तमाशा कलावंत स्व. कांताबाई सातारकर यांच्या स्मरणार्थ पहिल्या राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण
संगमनेर LIVE | राज्यातील कर्तबगार आमदार म्हणून आमदार अमोल खताळ यांची ओळख आहे. काम मंजूर करून घेण्यात त्यांचा हातखंडा कोणी धरू शकणार नाही. तालुक्यात औद्यगिक वसाहतीची त्यांची मागणी पूर्ण करण्यासठी पुढील आठवड्यातच बैठक घेणार असल्याची ग्वाही उद्योग तथा मराठी भाषा विभागाचे मंत्री नामदार उदय सामंत यांनी दिली.
आमदार अमोल खताळ यांच्या पुढाकाराने ज्येष्ठ तमाशा कलावंत स्व. कांताबाई सातारकर यांच्या स्मरणार्थ देण्यात येणाऱ्या पहिल्या राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत आणि जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाले. यंदाचा पुरस्कार सातारा जिल्ह्यातील वाई येथील तमाशा कलावंत कोडीराम आवडे मास्तर यांना प्रदान करण्यात आला. मानपत्र स्मृतीचिन्ह २१ हजाराचे मानधन असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष डॉ. गणेश चंदनशिवे, शाहीर विठ्ठल उमप यांच्या कन्या संगीता आणि कविता उमप, प्रा. एस. झेड. देशमुख, बापुसाहेब गुळवे, नाट्यकलावंत डॉ. सोमनाथ मुटकुळे, कपिल पवार, रामभाऊ राहाणे, विठ्ठलराव घोरपडे, पायल ताजणे, दिनेश फटांगरे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते साहीत्य कला आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
आमदार अमोल खताळ यांनी निवडूण आल्यानंतर कलावंताची दखल घेवून आमच्यापुढे सुध्दा एक आदर्श निर्माण केला आहे. आवळे मास्तर यांचा सन्मान एकट्याचा नसून राज्यातील सर्व लोक कलावंताचा आहे. यापुर्वी असे काम तालुक्यात झाले नाही. पण तुम्ही अमोल खताळ यांच्या रुपाने निवडून दिलेल्या लोकप्रतिनीधीने कलावंताचा केलेला सन्मान सोहळा पाहिला तर, तुम्हा मतदारांचे सुध्दा कौतुक असल्याचे मंत्री सावंत म्हणाले.
सरकार मधील मंत्र्याकडून काम दादागिरीने मंजूर कसे करून घ्यायचे हे अमोल खताळ यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. अंगावर जळू जसा चिकटून राहातो. तसा राजकीय जळू अमोल खताळ यांच्याकडे आहे. आज पुरस्काराच्या कार्यक्रमाला बोलावून औद्यगिक वसाहतीची त्यांंनी केलेली मागणी मला नाकारणे शक्य नाही. औद्यगिक वसाहतीच्या संदर्भात पुढील आठवड्यातच बैठक घेण्याचे आश्वासित करून मंत्री सावंत म्हणाले की, या तालुक्यातील युवकांच्या रोजगारासाठी अमोल खताळ यांची धडपड पूर्णत्वास नेवून तरूणांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी आम्ही कुठेही कमी पडणार नसल्याचे सांगितले.
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या भाषणात म्हणाले, संगमनेर तालुका कलावंताची खाण आहे. यापुर्वी कोणत्याच कलाकराचा असा सन्मान झाला नाही. परंतू अमोल खताळ यांच्या माध्यमातून झालेला सन्मान सोहळा तालुक्याची नवी ओळख निर्माण करणारा ठरला असल्याचे सांगून लोक कलेची जोपसाना करणाऱ्या कलाकवंतांनी स्वःताचे दुख बाजूला ठेवून समाजाला आनंद देण्याचा प्रयत्न केला. आवळे मास्तर यांनी त्या भावनेतून रंगभूमीची सेवा केल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. यापुढे तालुक्यात काॅ. दत्ता देशमुख, भास्कराराव दुर्वे, शाहीर विठ्ठल उमप, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंती दिनाचे सोहळे मोठ्या उपक्रमाने आयोजित करणार असल्याचे मंत्री विखे यांनी सांगितले.
बाकीचे उद्योग तालुक्यात आता बंद झाल्याचा टोला लगावून मंत्री विखे पाटील यांनी आमदार अमोल खताळ यांनी औद्यगिक वसाहतीच्या केलेल्या मागणीला पाठींबा देवून तालुक्यात लवकर औद्यगिक वसाहत येण्याच्या दृष्टीने दृष्टीने आपणही पाठपुरावा करू असे म्हटले.
जिल्ह्याला असलेला साहित्य कला आणि सांस्कृतिक वारसा पाहाता आम्हाला मराठी भाषा व सांस्कृतिक भवन उभारणीसाठी आम्ही जागा उपलब्ध करून देवू तुम्ही निधी द्यावा आशी मागणी केली.
आमदार अमोल खताळ यांनी या पुरस्काराच्या निमिताने तालुक्यात नव साहीत्य सांस्कृतिक पर्व निर्माण करण्याचा प्रयत्न असून दरवर्षी तालुक्यातील एका लोक कलावंताच्या नावाने आम्ही पुरस्कार देण्याचे नियोजन केले आहे. तालुक्यात रोजगार निर्माण करून देण्याच्या दृष्टीने यापुर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी औद्यगिक वसाहतीची केलेल्या घोषणेला मंत्री उदय सामंत यांनी मूर्त स्वरूप देण्याची मागणी केली.
पुरस्कार्थी कोडीराम आवळे मास्तर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना माझ्या ८० वर्षाच्या वाटचालीतील हा पहिला पुरस्कार असून ज्या भूमीत कलावंताची घडलो तिथे झालेला सन्मान मोठा आहे. आमदार खताळ यांनी यासाठी घेतलेल्या कष्टाने उर भरून आला असल्याची भावना व्यक्त केली.
दरम्यान कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि मानपत्राचे वाचन सौ. स्मिता गुणे यांनी केले. प्रारंभी तमाशा कलावतांनी गण सादर केले. छायाचित्रकार आण्णासाहेब काळे यांनी तमाशा कलेतील विविध स्मृतिच्या छायाचित्र सर्वाचे लक्ष वेधून घेणारे ठरले.