टाटा समूहाच्या मदतीने संगमनेरात रोजगार निर्मिती!

संगमनेर Live
0
टाटा समूहाच्या मदतीने संगमनेरात रोजगार निर्मिती!

◻️ पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची मोठी घोषणा

◻️ शहर ​विकास आराखड्यात संगमनेरकरांच्या सूचनांना प्राधान्य

​संगमनेर LIVE | ​शहरात पर्यायी रोजगार निर्मितीला चालना देण्याचा महायुती सरकारचा संकल्प असून, टाटा उद्योग समूहाच्या सहकार्याने महिला आणि युवकांसाठी एक मोठा रोजगार प्रकल्प तालुक्यात उभारण्याचा प्रयत्न करण्याची महत्त्वपूर्ण ग्वाही जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. शहरातील विविध प्रभागांमध्ये नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी ही घोषणा केली.

​मंत्री विखे पाटील यांनी शहरातील विविध प्रभागांमध्ये नागरीकांच्या भेटी घेतल्या. यावेळी शहरात अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या समस्यांची संख्या मोठी असल्याची नागरिकांनी व्यथा मांडली. यावर उत्तर देताना, आम्ही शहराचा विकास आराखडा तयार करताना नागरिकांच्या सूचना आणि समस्यांना प्राधान्य देण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

​महिला आणि तरुणांसाठी मोठा दिलासा

​भेटीदरम्यान अनेक प्रभागांमध्ये महिला आणि युवकांनी रोजगाराच्या तीव्र समस्येबद्दल चिंता व्यक्त केली. यावर तात्काळ उपाय म्हणून, ना. विखे पाटील यांनी महिला बचत गटांना मजबूत करण्यासाठी आवश्यक पाठबळ व सहाय्यता पुरविली जाईल. आयटीआय (ITI) शिक्षण पूर्ण केलेल्या तरुणांना शिर्डी येथील औद्योगिक वसाहतीमध्ये (MIDC) प्राधान्याने रोजगार देण्यासाठी काम केले जाईल. संगमनेर तालुक्यात जर मोठ्या जागेची उपलब्धता झाली, तर उद्योग आणण्यात कोणतीही अडचण नसल्याची ग्वाही दिली.

​शहरातील मूलभूत प्रश्नांवर तातडीचे लक्ष

​शहर विकासाच्या दृष्टीने रस्त्यांच्या कामावर मोठे लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. यासोबतच, लटकत्या वीज वाहक तारा, ड्रेनेजच्या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य दिले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. विशेषतः, नवीन नगर रस्त्यावरील दुकानदारांना पावसाच्या पाण्याचा होणारा गंभीर त्रास दूर करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

​पालिकेच्या कामात पारदर्शीपणा आणणार

​आमदार अमोल खताळ यांनी यावेळी आपल्या भाषणात पालिकेतील कारभारात सुधारणा करण्याची ग्वाही दिली. ते म्हणाले की, पालिकेत काम करण्यासाठी ठेकेदारांच्या बरोबरीने सल्लागार नेमण्याची प्रथा आता बंद करण्यात येणार आहे. 'ठेकेदाराच्या विळख्यात अडकलेली पालिका आपल्याला मुक्त करायची आहे,' असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले. कोणत्याही विकास कामांवर होणारा खर्च नागरिकांच्या माहितीसाठी जाहीर करून कामात पूर्ण पारदर्शीपणा आणण्याचे आश्वासनही आमदार खताळ यांनी दिले.

दरम्यान ​मंत्री विखे पाटील यांनी नवीन नगर रोडवरील व्यापारी आणि दुकानदारांच्या भेटी घेऊन महायुतीचा वचननामा सुपूर्द केला आणि आगामी निवडणुकीत महायुतीला विजयी करण्याचे आवाहन केले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !