सौर उर्जा प्रकल्प कार्यान्वित करून स्व. शिवाजीराव कर्डीले यांचे स्वप्न पूर्ण करणार
◻️ मंत्री विखे पाटील यांची वांबोरी चारी कामाच्या भूमीपुजन प्रसंगी ग्वाही
◻️ “माझे जे झाले ते अक्षयचे होवू देवू नका” - डॉ. सुजय विखे
संगमनेर LIVE (पाथर्डी) | मुळा धरणातील गाळ काढून अतिरीक्त पाणी निर्माण करण्यावर जलसंपदा विभागाने लक्ष केंद्रीत केले आहे. वांबोरी चारीवरील शेवटच्या गावालाही पूर्ण क्षमतेने पाणी मिळावे म्हणून बुस्टर पंप बसविण्याबाबत सर्व्हेक्षण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. भविष्यात उपसा सिंचन योजनेसाठी सौर उर्जा प्रकल्प कार्यान्वित करून शेतकऱ्यांवरील वीजेचा भार कमी करण्याचे स्व. शिवाजीराव कर्डीले यांचे स्वप्न पूर्ण करणार असल्याची ग्वाही जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
जलसंपदा विभागाच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या सुमारे १४.६० कोटी रुपयांच्या निधीतून वांबोरी चारी टप्पा १ च्या कामाचे भूमीपुजन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी आमदार मोनिका राजळे, आमदार संग्राम जगताप, डाॅ. सुजय विखे पाटील, अक्षय कर्डीले, जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता राजेश गोवर्धने, बाळासाहेब शेटे, कार्यकारी अभियंता सायली पाटील यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित होते.
आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील म्हणाले की, वांबोरी चारीच्या कामाला निधी उपलब्ध करून हे काम तातडीने सुरू करण्यासाठी स्व. कर्डीले साहेबांचा मोठा प्रश्न पाठपुरावा होता. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने आजचा कार्यक्रम आहे. यापुर्वी पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील आणि लोकनेते गोपीनाथ मुंढे यांच्या माध्यमातून या चारीच्या कामाला गती मिळाली होती. याची आठवण करून देत विखे यांनी सांगितले की, दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचे स्वप्न या जुन्या लोकांनी पाहीले होते. महायुती सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली यासाठी काम करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे.
मुळा धरणाच्या ५२ कि.मी. लांबीच्या कालव्याची आवस्था जीर्ण झाली. कालव्याचे अस्तरीकरण खराब झाल्याने या कामासाठी ११० कोटी रूपये मंजूर झाले असून त्या कामालाही सुरूवात झाली आहे. आज शुभारंभ झालेल्या टप्पा १ च्या कामाला १४.६० कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, मुळा धरणात अतिरिक्त पाणी निर्माण करण्यावर विभागाने लक्ष केंद्रीत केले आहे. यासाठी राज्यातील धरणातून गाळ काढण्याच्या धोरणाला मंत्रीमंडळाची लवकरच मंजूरी मिळेल प्रायोगिक तत्वावर मुळा धरणाचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे. यामुळे दोन ते अडीच टिएमसी पाणी निर्माण होईल असा विश्वास निर्माण करून यावर्षी आवर्तनाचे चांगले नियोजन झाल्याने पाण्याची टंचाई भासली नाही.
यापुर्वी वांबोरी चारीवरील उपसा सिंचन योजनेच्या वीज बीलांचा प्रश्न कायम अडचणीचा ठरायचा. ही समस्या कायमस्वरूपी दूर करण्यासाठी १५० मेगावॅट क्षमतेच्या फ्लोटींग सोलार प्रकल्प उभारण्याचा विभागाचा विचार असून शेतकऱ्यांवरील वीजेचा भार कसा कमी करता येईल असा प्रयत्न निश्चित होईल. मढी पर्यत पूर्ण क्षमतेने पाणी जात नसल्याच्या शेतकर्याच्या तक्रारीची दखल घेवून घाटशिरस जवळ बुस्टर पंप बसविण्याच्या संदर्भात अधिकाऱ्यांनी तातडीने सर्व्हेक्षण करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे स्पष्ट करून १४ टिएमसीच्या खाली फुट व्हाॅल्व गेल्यानंतर टप्पा १ साठी पाणी उचलता येत नाही. यासाठी फुट व्हाॅल्व खाली घेण्याबाबत ग्वाही मंत्री विखे पाटील यांनी दिली.
आमदार मोनिका राजळे यांनी पाण्याच्या बाबतीत असलेल्या प्रश्नाचा उल्लेख करून यावर्षी झालेल्या अतिवृष्टीत नूकसान झालेल्या पीकांचे पंचनामे तातडीने झाल्याबद्दल समाधान व्यक्त करून स्व. कर्डीले साहेबांच्या माध्यमातून यासर्व ३९ गावात समन्वयाने काम झाले. सर्व निवडणुका एकाविचाराने लढलो. भविष्यातही त्याच विचाराने काम करून अक्षयच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाही दिली.
डॉ. सुजय विखे पाटील यांनी वांबोरी चारीच्या प्रश्नाचे गांभीर्य स्व. कर्डीलै साहेबांनी सातत्याने मांडले. त्यांच्या पाठपुराव्यातून झालेल्या कामाच्या शुभारंभाला ते नाहीत याचे दुख आहे. यापुर्वी वांबोरी चारीच्या कामासाठी प्रयत्न केले. पण लोकांना जाणीव नाही. आज काय परीस्थीती निर्माण झाली. वांबोरी चारीच्या प्रश्नावर या भागातून निवडून गेलेले बोलायला तयार नाहीत. त्यांना या प्रश्नाची किती जाण आहे असा प्रश्न उपस्थित करून माझा कोणताही स्वार्थ नाही. पण भविष्यात माझे जे झाले ते अक्षयचे होवू देवू नका याची जाणीव करून द्यायला आलो आहे. पराभव झाला असला तरी वांबोरीच्या चारीला निधी देवून कामाचा शुभारंभ करायला विखे परीवारालाच यावे लागल्याचा टोला डाॅ. सुजय विखे यांनी लगावला.
अक्षय कर्डीले यांनी आपल्या भाषणात स्व. कर्डीले साहेबांप्रमाणेच तुमच्या सेवेत राहाण्याचा प्रयत्न करील. विखे, राजळे, जगताप परीवाराच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करणार असल्याचे सांगितले.