‘संगमनेरात ४० वर्षाची राजवट, तरी, औद्योगिक वसाहत का नाही?’
◻️नगरपालिका निवडणूक प्रचार सभेत संतोष रोहम यांचा हल्लाबोल
संगमनेर LIVE | आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संगमनेरच्या राजकारणात मोठे बदल अपेक्षित असून, शेतकरी नेते संतोष रोहम यांनी ‘चाळीस वर्षाच्या राजवटीवर' जोरदार टीकास्त्र सोडले आहे. आमदार अमोल खताळ यांच्या समर्थनार्थ बोलताना रोहम यांनी खताळ यांच्या कामांची प्रशंसा केली आणि नागरिकांना विकासाच्या बाजूने राहण्याचे आवाहन केले.
संगमनेर नगरपालिका निवडणूक प्रचार शिगेला पोहचला असताना कॉर्नर सभेत अमोल खताळ यांचे कौतुक करताना रोहम म्हणाले की, “समोरच्यांचे चाळीस वर्षात जी कामे झाली नाहीत, ती कामे सर्वसामान्य अमोल खताळ यांनी आमदार होताच मंजूर करून आणली. सर्व शक्ती असतानाही अशक्य गोष्टी शक्य करून दाखवल्या. संगमनेर विधानसभेत जो बदल घडला, तसाच बदल आता नगरपरिषद निवडणुकीत करायचा आहे.”
रोहम म्हणाले, “ज्या पक्षाने तुम्हाला आमदार आणि मंत्रिपद दिले, त्या पक्षाचे चिन्ह आणि पक्ष लपवण्याची वेळ का आली? याचे उत्तर माजी आमदारांनी द्यावे." असे आवाहन केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनांवर बोलताना रोहम म्हणाले, “चाळीस वर्षात तुम्ही औद्योगिक वसाहत आणू शकले नाही. त्यामुळे तुम्ही एकनाथ शिंदे यांना खोटे ठरवता. एकनाथ शिंदे यांनी दिलेले आश्वासन ते एक-दोन वर्षांत पूर्ण करतील.”
महसूल मंत्री असतानाही आरक्षणाचा प्रश्न का सुटला नाही, असा सवाल करत रोहम यांनी विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडण्याचे आवाहन केले.
ते म्हणाले, संगमनेरची जनता पैशावर विकणारी नाही, ही स्वाभिमानी जनता आहे. ती पैशाबरोबर नाही, तर विकासाबरोबर राहणारी जनता आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले. तसेच विश्वास मुर्तडक यांना संधी साधू म्हणत तोफ डागली आहे.
प्रभागाचे उमेदवार रवींद्र म्हस्के यांनी त्यांच्या प्रभागातील नागरिकांशी संवाद साधताना सांगितले की, “या प्रभागाच्या छोट्या छोट्या समस्या आहेत, त्या समस्या माजी नगरसेवकांना सोडवता आलेल्या नाहीत." निवडणुकीच्या वेळी एक रुपया न घेता तुमचे आरक्षण काढले जाईल, असेही म्हस्के यांनी मतदारांना आश्वस्त केले.