“नसबंदी करा, नाहीतर बंदुकीचे परवाने द्या!” - आमदार सत्यजीत तांबे
◻️ बिबट्याने १२ बळी घेतल्यामुळे संतप्त संगमनेरकरांचा ‘जन आक्रोश मोर्चा’
◻️ डॉ. जयश्रीताई थोरात यांची ठोस उपाययोजना करण्याची मागणी
◻️ सिद्धेशच्या वर्गमित्रांचे अश्रू पाहून उपस्थित गहिवर
संगमनेर LIVE | गेल्या वर्षभरात १२ निरपराध नागरिकांचा जीव घेणाऱ्या बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे संगमनेर तालुक्यात मोठी दहशत निर्माण झाली आहे. या बिबट्यांच्या वाढत्या वावरामुळे भयभीत झालेल्या हजारो नागरिकांनी आज रस्त्यावर उतरून सरकार आणि वन विभागाच्या असंवेदनशील कारभाराविरोधात तीव्र ‘जन आक्रोश’ आंदोलन केले. संगमनेर बस स्थानकापासून प्रांत कार्यालयापर्यत काढण्यात आलेल्या या भव्य मोर्च्यात सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, महिला आणि विद्यार्थ्याची लक्षणीय उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आमदार सत्यजीत तांबे यांनी प्रशासनाच्या उदासीनतेवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, “बिबटे आता जंगल सोडून थेट शेतांमध्ये वावरत आहेत. यामुळे शेतकरी महिला आणि लहान मुलांचे अंगणात खेळणे पूर्णपणे थांबले आहे. दररोज हल्ले होत असताना सरकार मात्र ढिम्म आहे.” तांबे यांनी केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडे केलेल्या मागणीचा पुनरुच्चार करताना म्हणाले, “अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर-अकोले पट्ट्यात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, राज्य शासनाने तातडीने बिबट्यांची मोजणी करून त्यांची नसबंदी करावी. नरभक्षक बिबट्यांना तात्काळ ठार मारण्याची परवानगी देण्यात यावी. शेतकऱ्यांच्या स्वसंरक्षणासाठी त्यांना बंदुकीचे परवाने देण्याची मागणीही तांबे यांनी केली. तसेच पकडलेल्या बिबट्यांना दूर अंतरावर सुरक्षित स्थळी सोडावे असे म्हटले.
डॉ. जयश्रीताई थोरात यांनी यावेळी राजकीय पदाधिकारी म्हणून नव्हे, तर ‘आई’ म्हणून मोर्च्यात सहभागी झाल्याचे नमूद केले. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली हा लढा सुरूच राहील, असे त्यांनी सांगितले. त्या म्हणाल्या “सिद्धेश कडलग आणि बिबट्यांच्या हल्ल्यात मृत पावलेल्या इतर कुटुंबीयांची अवस्था काय असेल, याची कल्पना प्रशासनाला नाही. त्यामुळेच प्रशासन उदासीन आहे. संगमनेर हा 'दुधाचा तालुका' असून, शेतकरी महिला बिबट्यांच्या दहशतीमुळे घाबरून शेतात काम करत आहेत. हे सर्व बिबटे पकडून त्यांना गुजरातच्या वन तारामध्ये सोडून कायमस्वरूपी प्रभावी बंदोबस्त करावा,” अशी आग्रही मागणी डॉ. थोरात यांनी केली.
डॉ. सुधीर तांबे यांनी सह्याद्रीच्या पायथ्याशी बिबट्यांचा वावर वाढल्याचे सांगत, सरकार काहीच करत नसल्याबद्दल खेद व्यक्त केला. “प्रशासनाचा इतका उदासीनपणा यापूर्वी कधीही पाहिला नव्हता,” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.
या जन आक्रोश आंदोलनात माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजीत तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात, पांडुरंग घुले यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी आणि हजारो नागरिक उपस्थित होते. डॉ. जयश्री थोरात स्वतः आपल्या लहान मुलासह मोर्चात सहभागी झाल्या होत्या, तर अनेक महिला, विद्यार्थी आणि नागरिकांनी आपले मनोगत व्यक्त करत वन विभागाच्या कारभारावर ताशेरे ओढले.
“आमच्या सिद्धेशला परत आणा!"
जवळे कडलग येथील बिबट्याच्या हल्ल्यात जीव गमावलेल्या सिद्धेश कडलक याचे लहानगे वर्गमित्र मोठ्या संख्येने मोर्च्यात सहभागी झाले होते. हातात फलक घेऊन "आमच्या सिद्धेशला परत आणा, त्याला न्याय द्या,” असे म्हणताना या चिमुकल्यांना अश्रू अनावर झाले. लहानग्यांचा हा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले आणि संपूर्ण परिसर शोकाकुल झाला होता.
दरम्यान संगमनेर बस स्थानक ते प्रांत कार्यालय या मार्गावर काढलेल्या या भव्य मोर्च्याद्वारे नागरिकांनी बिबट्यांच्या दहशतीपासून कायमस्वरूपी मुक्तता करण्याची मागणी शासनाकडे केली आहे.