‘कर्ममार्गाचा महामंत्र’ ज्ञानगंगा विद्यानिकेतनमध्ये ‘गीता जयंती’ उत्साहात साजरी
◻️ इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यानी केले १२ व्या आणि १५ व्या अध्यायाचे पाठांतर!
संगमनेर LIVE | जगातील एकमेव ग्रंथ ज्याची जयंती मोठ्या भक्तीभावाने साजरी केली जाते, त्या ‘श्रीमद् भगवद्गीतेची’ जयंती (गीता जयंती) नुकतीच संगमनेर तालुक्यातील शैक्षणिक संकुलातील ज्ञानगंगा विद्यानिकेतन येथील आनंदसागर अध्यात्मिक केंद्रामध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या सोहळ्याला इयत्ता नववीचे सर्व विद्यार्थी आणि वर्गशिक्षिका शुभांगी गाडेकर या उपस्थित होत्या.
या प्रसंगाचे औचित्य साधून विद्यार्थ्यानी अत्यंत एकाग्रतेने श्रीमद् भगवद्गीतेतील अध्याय बारावा (भक्तियोग) आणि अध्याय पंधरावा (पुरुषोत्तमयोग) यांचे सामूहिक पाठांतर केले. विद्यार्थ्याच्या मुखातून निघालेल्या या श्लोकपठणामुळे केंद्राचे संपूर्ण वातावरण शुद्ध आणि अध्यात्ममय झाले होते.
पाठांतरानंतर प्रा. प्रदीप जगताप यांनी उपस्थितांना श्रीमद् भगवद्गीतेच्या निर्मितीमागील दैवी आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी सविस्तरपणे समजावून सांगितली. प्रा. जगताप म्हणाले, “भगवंतांनी जगाच्या कल्याणासाठी दिलेला उपदेश म्हणजेच भगवद्गीता होय. हा ग्रंथ केवळ मोक्षाचा मार्ग नव्हे, तर कर्तव्यपरायणतेचा आणि कर्ममार्गावर निष्ठा ठेवण्याचा अमूल्य संदेश देतो.”
मोहाच्या पाशात अडकलेला श्रेष्ठ धनुर्धारी अर्जुन जेव्हा आपले कर्तव्य विसरून धनुष्य खाली ठेवतो आणि युद्धास नकार देतो, तेव्हा भगवान श्रीकृष्ण त्याला निमित्त करून संपूर्ण विश्वाला त्यांच्या कर्तव्याची जाणीव आणि कर्मयोगाचे महान तत्त्वज्ञान भगवद्गीतेच्या माध्यमातून देतात.
त्यामुळे, ही ‘भगवद्गीता’ म्हणजे केवळ धर्मग्रंथ नसून, मानवाला जीवनातील प्रत्येक संघर्षात योग्य निर्णय घेण्यासाठी मार्गदर्शन करणारा, जगाच्या पाठीवरील एक अद्वितीय तत्त्वज्ञान ग्रंथ आहे. असे सांगितले.
दरम्यान ज्ञानगंगेतील विद्यार्थ्यानी गीता जयंतीच्या निमित्ताने कर्म आणि धर्माचे महत्त्व आत्मसात केले आणि आध्यात्मिक जाणिव अधिक मजबूत केल्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.