‘कुकडी’चे रब्बी आवर्तन २६ डिसेंबरपासून सुरू!
◻️ जलसंपदा मंत्री विखे पाटील यांचा आवर्तनाला हिरवा कंदील
◻️ तीन जिल्ह्यांतील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना होणार लाभ
संगमनेर LIVE (अहिल्यानगर) | शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेवून जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी रब्बी हंगामासाठी २६ डिसेंबर पासून तातडीने आवर्तन सोडण्यास मान्यता दिल्याने पुढील चाळीस दिवसांच्या आवर्तनाचे नियोजन जलसंपदा विभागाने केले आहे.
नगरपरिषद निवडणूकीची अचारसंहीता सुरू असल्याने कालवा सल्लागार समितीची बैठक होवू शकली नाही. मात्र निवडणुकीची प्रक्रीया पूर्ण होताच जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची अडचण दूर करण्यासाठी आवर्तन सोडण्याच्या सूचना विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
कुकडीचे लाभक्षेत्र तीन जिल्ह्यामध्ये समाविष्ट आहे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव शिरूर जुन्नर सोलापूर जिल्ह्यातील करमाळा आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत श्रीगोंदा पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना कुकडीच्या आवर्तनाचा लाभ मिळत असतो. लाभक्षेत्रात सध्या रब्बी हंगामातील पीकांना आवर्तनाचा लाभ होण्याच्या दृष्टीने चाळीस दिवसांच्या कालावधीचे नियोजन करण्याच्या सूचना मंत्री विखे पाटील यांनी दिल्या.
कुकडी प्रकल्पात सध्या २६ टिएमसी पाणी साठा आहे. पाण्याचे सुयोग्य नियोजन विभागाने केले आहे. असलेल्या पाण्याचा वापर पिण्याच्या शेतीसाठी होण्याच्या दृष्टीने जलसंपदा विभागाचे धोरण आहे. त्यामुळेच रब्बी हंगामासाठी सोडण्यात आलेल्या आवर्तनाचा लाभ शेवटच्या गावाला होण्याच्या दृष्टीने अधिकाऱ्यांनी नियोजन करून पाण्याचा अपव्यय टाळावा आशा सूचना मंत्री विखे पाटील यांनी दिल्या आहेत.