निळवंडे उपसा सिंचन योजनेस नामदार विखे पाटील यांची तत्त्वतः मान्यता
◻️ चंदनापूरी, सावरगावतळ, झोळे, हिवरगाव पावसा आणि शिरापूर या ५ गावांचा पाण्याचा प्रश्न सुटणार
संगमनेर LIVE | शाश्वत पाण्यापासून अनेक वर्षापासून वंचित असलेल्या संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी, सावरगावतळ, झोळे, हिवरगाव पावसा आणि शिरापूर या पाच गावांना आता निळवंडे धरणाचे पाणी मिळणार आहे. जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या गावांच्या उपसा सिंचन योजनेस आज तत्त्वतः मान्यता दिली असून, प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यावरून राबविण्यात येणाऱ्या या महत्त्वाकांक्षी उपसा सिंचन योजनेसाठी सुमारे २५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या योजनेमुळे चंदनापुरी, सावरगावतळ, झोळे, हिवरगाव पावसा आणि शिरापूर या दुष्काळी भागातील गावांसाठी शाश्वत पाण्याचा स्त्रोत उपलब्ध होणार आहे. सध्या या योजनेचे सर्वेक्षण आणि अंदाजपत्रक तयार असून, जलसंपदा मंत्र्यांच्या आदेशानंतर आता प्रशासकीय मान्यतेचा अंतिम प्रस्ताव नियामक मंडळासमोर सादर केला जाणार आहे, ज्यामुळे प्रत्यक्ष कामाचा मार्ग मोकळा झाला आहे.
आमदार अमोल खताळ यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज पालकमंत्र्यांची भेट घेऊन या योजनेची नितांत गरज असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. या योजनेचे सर्वेक्षण पूर्ण झाले असूनही पुढील कार्यवाही प्रलंबित होती. यावेळी चंदनापुरीचे माजी सरपंच प्रमोद रहाणे, शिवसेना तालुकाप्रमुख रामभाऊ रहाणे, ग्रामपंचायत सदस्य श्याम राहाणे, सावरगावतळचे शरद नेहे आदींनी ही मागणी लावून धरली.
बैठकीत जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता कवडे व माने यांनी माहिती दिली की, योजनेचे प्रारूप सर्वेक्षण व अंदाजपत्रक आधीच तयार आहे. ही वस्तुस्थिती समोर येताच नामदार विखे पाटील यांनी दिरंगाई न करता योजनेस मान्यता दिली आणि नियामक मंडळासमोर प्रस्ताव ठेवण्याचे आदेश दिले.
या निर्णयामुळे सुमारे २५ कोटींच्या या योजनेचा मार्ग मोकळा झाला आहे. हिवरगाव पावसा, झोळे आणि चंदनापुरी परिसरातील शेतकऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून पालकमंत्री विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांचे आभार मानले आहेत.
यावेळी भाजपचे माजी तालुकाध्यक्ष काशिनाथ पावसे, सरचिटणीस गणेश दवंगे, सरपंच सुभाष गडाख (हिवरगाव पावसा), उपसरपंच सुजाता दवंगे, उपसरपंच गोविंद खर्डे (झोळे), ग्रामपंचायत सदस्य शाम रहाणे, अंकुश रहाणे, किसन सरोदे, नितीन रहाणे, केशव दवंगे यांसह अनेक पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.