‘एआय’ क्रांतीमुळे होणारे बदल स्वीकारा - अच्युत गोडबोले
◻️अमृतवाहिनी मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स विषयावर चर्चासत्र संपन्न
संगमनेर LIVE | संगणकामुळे मानवी जीवनामध्ये मोठा बदल झाला आहे. भविष्यामध्ये एआय मुळे मोठी क्रांती होणार असून अनेकांच्या नोकऱ्या जातील तशा अनेक नवीन नोकऱ्या निर्माण होतील म्हणून प्रत्येक युवकाने एआय तंत्रज्ञानाशी जुळून घेत सातत्याने शिकले पाहिजे. प्रत्येक क्षेत्रात एआय मुळे मोठी क्रांती होणार असून ती स्वीकारा असे आवाहन प्रसिद्ध लेखक तथा संशोधक डॉ. अच्युत गोडबोले यांनी केले आहे.
अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्था आणि डबल डेकर ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आर्टिफिशियल इंटेलिजन्स या चर्चासत्रात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात हे होते. व्यासपीठावर डॉ जयश्रीताई थोरात, एआय मधील तंत्रज्ञ डॉ. सुयश गुंजाळ, सौ. दुर्गाताई तांबे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, प्रा. व्ही. बी. धुमाळ, डॉ. एम. ए. वेंकटेश, डॉ. जे. बी. गुरव, डॉ. बी. एम. लोंढे, डॉ. मनोज शिरभाते, डॉ. राजेंद्र वाघ, विलास भाटे, सौ. जे. बी. सेठी, अंजली कन्नावार, नामदेव गायकवाड आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना अच्युत गोडबोले म्हणाले की, अमृतवाहिनी संस्थेने विद्यार्थ्याना अत्यंत चांगल्या सुविधा दिल्या असून नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती प्रत्येकाने घेतली पाहिजे. आगामी काळ हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा असून प्रत्येक क्षेत्रामध्ये तिचा वापर वाढतो आहे. मेडिकल, व्हेईकल, इंजीनियरिंग कृषी अशा सर्व क्षेत्रांमध्ये एआय काम करत आहे. भविष्यामध्ये विना वाहक गाडी, गायन वादन लेखन या क्षेत्रामध्ये, चॅट जीपीटी जेमिनी ग्राफ यासारखे टूल्स सहज सुविधा उपलब्ध करून देत आहे. पुढील दहा वर्षात कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे मोठी क्रांती होणार असल्याने अनेकांच्या नोकऱ्या जाण्याची भीती आहे. मात्र नवीन नोकरी निर्माण होईल याकरता नवीन तंत्रज्ञान प्रत्येकाने आत्मसात केलेच पाहिजे. आपल्या क्षेत्रामध्ये एआयचा वापर वाढवा. प्रत्येक काम उत्कृष्टपणे करा.
कॉम्प्युटरला आपण माहिती देतो आणि त्यातून पॅटर्न देतो १९४० मध्ये सुरू झालेल्या एआय मध्ये यंत्राला बुद्धी ही संकल्पना राबवण्यात आल्याने आगामी काळामध्ये अनेक बदल स्वीकारावे लागणार आहेत. यासाठी युवकांनी सातत्याने नवीन तंत्रज्ञानाचा अभ्यास करावा असे आवाहन त्यांनी केले.
ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, डबल डेकर ग्रुपच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांवर अधिक माहिती व्हावी याकरता चर्चासत्राचे आयोजन होत असते. एआय हा नवीन तंत्रज्ञानातील अविभाज्य भाग असून प्रत्येक तरुणाला आपल्या क्षेत्राशी निगडित विषयांमध्ये त्याचा वापर वाढवणे गरजेचे आहे.
डॉ. सुयश गुंजाळ म्हणाले की एआय तंत्रज्ञान सर्व क्षेत्रांसाठी खुले आहे. माहिती तंत्रज्ञानातील वेगवेगळ्या टूलचा वापर करून स्वतःला सिद्ध करा असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान या कार्यक्रमाचे स्वागत डॉ. जयश्रीताई थोरात यांनी केले. प्रास्ताविक ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले. तर, डॉ. एम. ए. वेंकटेश यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी डबल डेकर ग्रुप चे सर्व सदस्य व अमृतवाहिनी शिक्षण संस्थेतील सर्व विभाग प्रमुख शिक्षक व सर्व विभागांमध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
डबल डेकर अभ्यास गट अत्यंत स्तुत्य संकल्पना
राज्यभरातील अनेक नेते फक्त राजकारणासाठी तरुणांचा वापर करतात. मात्र संगमनेर मध्ये लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी तरुणांना कायम करिअरच्या संधी उपलब्ध करून दिले असून तरुणांनी चांगला विचार करावा. जगातील वेगवेगळ्या विषयांची माहिती त्यांना व्हावी याकरता दर शनिवारी विविध विषयांवर त्या क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींचे व्याख्यान व चर्चासत्राचे आयोजन ही अत्यंत सत्य संकल्पना असल्याचे ज्येष्ठ लेखक डॉ. अच्युत गोडबोले यांनी म्हटले आहे.