लोकप्रतिनिधीना विश्वासात घेवूनच रेल्वे मार्गाचे निर्णय व्हावेत - ना. विखे पाटील
◻️ जनतेतील संभ्रम दूर करण्यासाठी रेल्वे मंत्र्यांना बैठक बोलविण्याची केली विनंती
संगमनेर LIVE (लोणी) | पुणे - नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पा संदर्भात सर्व लोकप्रतिनिधीना विश्वासात घेतल्या शिवाय कोणतेही निर्णय करू नयेत, प्रस्तावित रेल्वे मार्गाच्या बदलाबाबत झालेला संभ्रम दूर करण्यासाठी तातडीने बैठक बोलवावी आशी विनंती जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांना केली आहे.
पुणे - नाशिक प्रस्तावित रेल्वे मार्गावरून अहिल्यानगर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी तसेच जनतेमध्ये निर्माण झालेल्या संभ्रमाच्या पार्श्वभूमीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांना सविस्तर पत्र लिहून प्रस्तावित रेल्वे मार्गा संदर्भात चर्चा करण्यासाठी तातडीने बैठक बोलाविण्याची विनंती केली आहे.
संसदेच्या अधिवेशनात पुणे - नाशिक रेल्वे प्रकल्पाच्या झालेल्या चर्चे दरम्यान प्रस्तावित मार्गात बदल करून रेल्वे मार्ग शिर्डीहून प्रस्तावित केल्याची बाब समोर आल्याने जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला. या प्रकल्पाच्या तयार करण्यात आलेल्या पहिल्या आराखड्यानूसार नारायणगाव, संगमनेर, सिन्नर, नाशिक या भागातून रेल्वे मार्ग निश्चित कररण्यात आला आहे. यासाठी जमीनीचे भूसंपादन करण्यात आले होते. मात्र अचानक झालेला बदल सर्वानाच आश्चर्यकारक असल्याचे डॉ. विखे पाटील यांनी पत्रात नमूद केले.
यापुर्वी तयार करण्यात आलेल्या रेल्वे प्रकल्पाच्या आराखड्यातील बदलाबाबत कोणतीही चर्चा जिल्ह्यातील लोकसभा आणि विधान सभेच्या सदस्यांशी करण्यात आलेली नाही. प्रकल्प मार्गातील बदल करताना लोकप्रतिनिधीना विश्वासात घेणे गरजेचे होते. परंतू तशी कोणतीही चर्चा न झाल्याने लोकप्रतिनीधीसह जनतेमध्ये रेल्वे मार्गाबाबत मोठ्या प्रमाणात निर्माण झालेल्या संभ्रमाच्या वातावरणाचा रोष लोकप्रतिनिधींना सहन करण्याची वेळ आली असल्याचे गांभीर्य मंत्री विखे पाटील यांनी रेल्वे मंत्र्याच्या निदर्शनास आणून दिले.
प्रस्तावित रेल्वे मार्गाबाबत पहिल्यापासून असलेली मागणी विचारात घेण्यासाठी आपण तातडीने सर्व लोकप्रतिनिधीची बैठक बोलवावी, तसेच लोकप्रतिनिधीना विश्वासात घेतल्याशिवाय नासिक पुणे रेल्वे मार्गाबबात कोणतेही निर्णय करू नयेत, आशी विनंती नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्राद्वारे आश्विनी वैष्णव यांना केली आहे.