विकासासाठी निधी आणण्यात आमची पीएचडी - आमदार सत्यजीत तांबे
◻️ संगमनेरमध्ये दहशत व गुंडगिरी खपवून घेणार नाही; थेट इशारा
संगमनेर LIVE | लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर शहर एक कुटुंब म्हणून नांदत असताना, येथे आता गुंडगिरी, दडपशाही आणि हप्तेखोरी करणाऱ्या प्रवृत्तीला थारा दिला जाणार नाही. हे शहर आपल्या सगळ्यांची अस्मिता आहे आणि त्याची शांतता बिघडवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा आमदार सत्यजीत तांबे यांनी दिला आहे.
तसेच, संगमनेर शहराच्या विकासाचा परिपूर्ण आराखडा तयार असून, 'विकास कामांसाठी निधी आणण्यात आमची पीएचडी झाली आहे,' या शब्दांत त्यांनी निधी पुरवठ्याबद्दलचा आपला आत्मविश्वास व्यक्त केला.
चैतन्य नगर, मालदाड रोड, मेन रोड, आणि घोडेकर मळा येथे झालेल्या बैठकांमध्ये ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर लोकनेते बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, उत्कर्षाताई रुपवते यांच्यासह संगमनेर सेवा समितीचे विविध उमेदवार उपस्थित होते.
आमदार सत्यजीत तांबे यांनी यावेळी शहराच्या सध्याच्या परिस्थितीवर तीव्र शब्दांत टीका केली. ते म्हणाले, “मागील चार वर्षापासून नगरपालिका प्रशासकाच्या ताब्यात आहे आणि हे प्रशासन सत्ताधाऱ्यांच्या मर्जीने काम करत असल्याने विकास कामे रखडली आहेत. साध्या सभेची परवानगी मिळवण्यासाठीही प्रशासनाकडून दबाव आणला जातो.”
मागील काळात बस स्थानकासह शहरात अवैध धंद्यांचा सुळसुळाट वाढला असून, दादागिरी आणि हप्तेखोरी वाढली आहे. ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्यावर 'डबल कमान' लावून काही प्रवृत्तीने आपली हिंसक मानसिकता दाखवून दिली आहे. हे आता खपवून घेतले जाणार नाही, असे त्यांनी ठणकावले.
“संगमनेर सेवा समितीने शहराच्या भविष्यासाठी परिपूर्ण विकासाचा आराखडा तयार केला आहे,” असे सांगत तांबे म्हणाले की, स्वच्छ पिण्याच्या पाण्यापासून ते पस्तीस गार्डन निर्माण करण्यापर्यत मोठे प्रकल्प यापूर्वी मार्गी लागले आहेत. लोकनेते बाळासाहेब थोरात यांचा सर्व मंत्री आदर करतात. त्यांच्या माध्यमातून सातत्याने निधी आणला जाईल आणि त्यासाठी लागणारा पाठपुरावा करण्यात आम्हाला कोणतीही अडचण नाही; कारण निधी मिळवण्यात आमची 'पीएचडी' झाली आहे.
बाळासाहेब थोरात म्हणाले, “शहराच्या विकासासाठी आणि आपल्या संस्कृतीसाठी आता सर्वानी एक राहायचे आहे. मागील एका वर्षात शहरात सुरू झालेल्या अनेक चुकीच्या गोष्टी दुरुस्त करायच्या आहेत. पुन्हा संगमनेर शहराला गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी आणि तालुका राज्यात अग्रगण्य बनवण्यासाठी एकत्रित काम करणे आवश्यक आहे.”
माजी आमदार डॉ. सुधीर तांबे म्हणाले ‘काही 'कायदे पंडित' संगमनेरच्या विकासाबाबत बोलत आहेत, पण त्यांचे योगदान काय? विकास कामांमध्ये अडथळे निर्माण करणे हाच त्यांचा उद्योग राहिला आहे.”
यावेळी शहरातील व्यापाऱ्यांमध्ये पसरलेल्या अस्वस्थतेवरही लक्ष वेधण्यात आले. एका ऑडिओ क्लिपमध्ये व्यापाऱ्यांना धमकी दिल्याचा प्रकार नुकताच व्हायरल झाला असून, अशा अनेक क्लिप्समुळे धमक्या आणि दडपशाही वाढल्याची कुजबूज व्यापारी वर्गात आहे. प्रामाणिक बाजारपेठ ही संगमनेरची ओळख असून, मागील एक वर्षापासून या प्रकारांमुळे व्यापारी त्रस्त झाले असल्याचे यावेळी सांगण्यात आले.