पुणे-नाशिक रेल्वेचा पेच सुटणार! रेल्वेमंत्र्याकडून विखे पाटलांना बैठकीचे आश्वासन
◻️ पालकमंत्र्यांच्या पत्रानंतर रेल्वे मंत्रालयाची हालचाल; प्रस्तावित मार्गाबाबत चर्चा होणार
संगमनेर LIVE (लोणी) | पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गासंदर्भात चर्चा करण्यासाठी लवकरच बैठक घेण्याची ग्वाही केंद्रीय रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांनी पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना दिली. दोन्ही मंत्र्यामध्ये झालेल्या चर्चेनंतर लवकरच बैठकीची तारीख निश्चित केली जाणार आहे.
पुणे-नाशिक रेल्वे मार्गा संदर्भात मंत्री विखे पाटील यांनी रेल्वे मंत्री वैष्णव यांना सविस्तर पत्र देवून रेल्वे प्रकल्पाच्या बाबतीत सर्व लोकप्रतिनिधीची बैठक बोलाविण्याची विनंती केली होती. मंत्री आश्विनी वैष्णव यांनी विखे पाटील यांच्याशी संपर्क करून या विषयावर चर्चा केली. रेल्वे मार्गाच्या संदर्भात झालेल्या बदलाबाबत दोघांमध्ये झालेल्या चर्चेनंतर लवकरच बैठक घेण्याबाबत मंत्री आश्विनी वैष्णव यांनी सकारत्मकता दर्शवली.
पुणे-नाशिक रेल्वे मार्गाचा आराखडा तयार करताना पुणे, नारायणगाव, संगमनेर, अकोले, सिन्नर आशा पध्दतीने करण्यात आला होता. मात्र संसदेच्या अधिवेशनात या विषयावर झालेल्या चर्चे दरम्यान प्रस्तावित मार्गात बदल करण्यात आले. यावरून संगमनेर-अकोले तालुक्यात लोकप्रतिनिधी आणि नागरीकात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. संगमनेर अकोले तालुक्यातील नागरीकांनी पालकमंत्री विखे पाटील यांची भेट घेवून रेल्वे मार्ग पहिल्या प्रस्तावित मार्गाने नेण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेवून नामदार विखे पाटील यांनी नासिक पुणे रेल्वे मार्गाबाबत लोकप्रतिनिधी आणि जनतेच्या भावना रेल्वे मंत्र्यापर्यत पोहचविण्याची विनंती केली होती.
यासर्व पार्श्वभूमीवर मंत्री विखे पाटील यांनी रेल्वे मंत्र्याशी चर्चा करताना प्रस्तावित मार्गात बदल करताना कोणत्याही लोकप्रतिनिधींना विचारात घेतलेले नाही. मार्गातील झालेल्या बदलामुळे जनतेतून निर्माण झालेल्या रोषास लोकप्रतिनिधीना सामोरे जावे लागत असल्याचे गांभीर्य रेल्वे मंत्र्याच्या निदर्शनास आणून दिले. तसेच या विषयावर चर्चा करण्यासाठी वेळ देण्याची विनंती केली. रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांनी विखे पाटील यांना या प्रश्नावर लकवरच बैठकही बोलावतो असे आश्वासित केले आहे.
विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक ते अक्कलकोट या नविन ग्रीन फिल्ड मार्गाला मंजूरी दिल्याबद्दल नामदार विखे यांनी केंद्र सरकारचे आभार मानले. प्रस्तावित मार्ग अहिल्यानगर जिल्ह्यातून सोलापूरला जोडण्यात येणार असल्याने जिल्ह्यातील उद्योग, व्यावसायिक तसेच तिर्थक्षेत्र, औद्यगिक विकासाला लाभ होईल आशी अपेक्षा व्यक्त केली.