'कासारा दुमाला'च्या विकास प्रकल्पाना भाऊ कदम आणि सौ. नीलम खताळ यांची भेट
◻️ ‘चला हवा येऊ द्या' फेम अभिनेत्याकडून घरकुलपासून गोठ्यापर्यत विविध विकासकामाची पाहणी
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील कासारा दुमाला गावामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत राबवण्यात आलेल्या विविध विकासकामांची पाहणी करण्यासाठी 'चला हवा येऊ द्या' फेम प्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम यांनी नुकतीच भेट दिली. अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या वतीने या अभियानाचा प्रचार-प्रसार आणि ग्रामीण भागात जनजागृती करण्यासाठी दूत म्हणून भाऊ कदम यांची निवड करण्यात आली असून, या पार्श्वभूमीवर त्यांनी गावाला भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला.
या भेटीची सुरुवात वृक्षारोपणाने करण्यात आली. यावेळी सौ. नीलम खताळ, सरपंच राजेंद्र त्रिभुवन, शिवसेना उपजिल्हा प्रमुख रमेश काळे आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी भाऊ कदम यांनी गावातील विविध वैयक्तिक आणि सार्वजनिक प्रकल्पांना प्रत्यक्ष भेटी दिल्या. यामध्ये जनार्दन जाधव यांचा मोहगणी वृक्ष लागवड प्रकल्प, तुळशीराम सातपुते यांचा आधुनिक गाय गोठा आणि घनश्याम गुंजाळ यांच्या लिंबू लागवड प्रकल्पाचा समावेश होता. तसेच त्यांनी मीराबाई अभंग यांचा घरकुल प्रकल्प आणि रुक्मिणी महिला बचत गटाच्या माध्यमातून चालणाऱ्या व्यवसायाची पाहणी करून लाभार्थ्याचे कौतुक केले. सार्वजनिक सुविधांतर्गत स्वच्छ भारत मिशनमधील घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, फिल्टर पाणी योजना आणि नदी घाट परिसरातील कामांची त्यांनी आवर्जून दखल घेतली.
लोकसहभागाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी बाबाजी समाधी मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम व श्रमदान करण्यात आले, ज्यात भाऊ कदम यांनी स्वतः सहभाग नोंदवला. त्यानंतर त्यांनी जिल्हा परिषद शाळा आणि काशेश्वर माध्यमिक विद्यालयाला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.
दरम्यान कार्यक्रमाच्या शेवटी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आयोजित सभेत बोलताना त्यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे गावाच्या सर्वागीण प्रगतीसाठी कसे मैलाचा दगड ठरणार आहे, याची सविस्तर माहिती दिली. या दौऱ्यामुळे कासारा दुमाला गावाच्या विकासकामांची चर्चा आता संपूर्ण तालुक्यात होत आहे.