“हनुमान हेच गावाचे आणि देवाचे खरे रक्षक” - निवृत्ती महाराज देशमुख
◻️ उंबरी बाळापूर येथे दत्तगिरी महाराज यांच्या हस्ते श्री हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा
संगमनेर LIVE (आश्वी) | “हनुमंत राया हा गावाचा आणि देवाचा रक्षणकर्ता आहे. प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रालाही अहिरावण - महिरावणाच्या तावडीतून हनुमानानेच वाचवले होते. त्यामुळेच श्री रामचंद्राचे खरे आणि सर्वात आवडते भक्त म्हणून हनुमान नावारूपास आले,” असे प्रतिपादन निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांनी केले.
संगमनेर तालुक्यातील श्री क्षेत्र उंबरी बाळापूर येथे आयोजित श्री हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आयोजित कीर्तन सेवेत इंदुरीकर महाराज बोलत होते. या धार्मिक सोहळ्याची नुकतीच महाप्रसादाने सांगता झाली.
गावामध्ये गेल्या तीन दिवसांपासून हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात मूर्तीची भव्य आणि दिव्य मिरवणूक, पूजा-अर्चा, विधिवत होम-हवन आणि महाआरती आदी कार्यक्रमांचा समावेश होता. या सर्व धार्मिक विधींचे पौरोहित्य गुरू महेश सांबरे आणि त्र्यंबकेश्वर येथून आलेल्या ब्रह्मवृंदांनी अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने पार पाडले.
या सोहळ्यात श्री हनुमान मूर्तीची प्राणप्रतिष्ठा वरवंडीचे मठाधिपती महंत दत्तगिरी महाराज यांच्या हस्ते आणि मंत्रोच्चारांच्या गजरात मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या धार्मिक सोहळ्यात विधिवत पूजेसाठी गावातील ११ जोडप्यांनी सहभाग नोंदवला. सर्व धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
दरम्यान या भव्य धार्मिक सोहळ्यासाठी गावातील सर्व ग्रामस्थ आणि भाविकांनी भरीव स्वरूपात आर्थिक आणि शारीरिक मदत केली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजक समिती, ‘जय श्रीराम हनुमान चालीसा मंडळ’ आणि ग्रामस्थांसह तरुण वर्गाने विशेष परिश्रम घेतले.