१४ फेब्रुवारीपासून पाडोशी सांगवीचे पाणी लाभक्षेत्रात झेपावणार!
◻️ पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे प्रशासनाला आदेश
◻️ माजी आमदार वैभव पिचड आणि सुनिता भांगरे यांच्या पाठपुराव्याला यश
संगमनेर LIVE (अकोले) | लाभक्षेत्रातील पिण्याच्या पाण्याची आणि शेती पीकांची गरज लक्षात अकोले तालुक्यातील पाडोशी सांगवी धरणातून १४ फेब्रुवारी पासून आवर्तन सोडण्याच्या सूचना जलसंपदा तथा पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
यासंदर्भात माजी आमदार वैभव पिचड, श्रीमती सुनिता भांगरे यांच्यासह शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेवून पाणी सोडण्याची मागणी केली होती.
सद्य परिस्थितीत उन्हाची तीव्रता जाणवू लागल्याने लाभक्षेत्रातील काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागली असून, शेती पीकांनाही पाण्याची गरज असल्याची बाब शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने मंत्री विखे पाटील यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर पाण्याची असलेली उपलब्धता विचारात घेवून आवर्तन सोडण्याच्या सूचना मंत्री विखे पाटील यांनी दिल्या.
आवर्तन कालावधीत पाण्याचा अपव्यय होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश मंत्री विखे पाटील यांनी विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेती पीकांना मोठा दिलासा मिळाला आहे.