नवा कारखाना उभारून गाळपाचा ऐतिहासिक विक्रम करून दाखवला!
◻️ मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत डॉ. विखे कारखान्याच्या गळीत हंगामाचा समारोप
संगमनेर LIVE (लोणी) | १० हजार मेट्रीक टन गाळप क्षमतेचा नविन प्रकल्प अवघ्या सहा महीन्यात उभारण्याचा आणि कमी कालावधीत गाळप हंगाम यशस्वी करण्याचा ऐतिहासिक विक्रम पद्मश्रीं डॉ. विखे पाटील कारखान्याने करून दाखवला असल्याचे गौरवोद्गार जलसंपदा तथा पालक मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी काढले.
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखानाच्या ७६ व्या गळीत हंगामाचा सांगता समारंभ माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. चेअरमन डॉ. सुजय विखे पाटील, सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, नंदूशेठ राठी, मकरंद गुणे, मच्छिंद्र थेटे, नगराध्यक्ष डॉ स्वाधीन गाडेकर, सौ. जयश्री थोरात, उपनगराध्यक्ष अभय शेळके, कारखान्याचे कार्यकारी संचालक महेश कोनापुरे, तहसिलदार अमोल मोरे यांच्यासह सर्व संचालक सभासद अधिकारी कामगार याप्रसंगी उपस्थित होते.
अवघ्या सहा महिन्यात कारखान्याच्या नव्या प्रकल्पाची उभारणी डाॅ. सुजय विखे पाटील आणि सर्व संचालकांनी समर्पित भावनेने केली. सर्व अधिकारी कामगार यांचेही योगदान यामध्ये महत्वपूर्ण राहिल्यामुळेच सहकारी साखर कारखानदारीच्या क्षेत्रात एक नवा विक्रम स्थापीत झाल्याचा गौरवपूर्ण उल्लेख करून मंत्री विखे पाटील म्हणाले की, विनाविलंब कारखाना यशस्वीपणे चालल्यामुळे गाळपाच्या उद्दीष्टापर्यत आपण पूर्ण करू शकलो.
यंदाच्या वर्षी पाऊस जास्त झाल्याने ऊसाचे वजन घटल्याची तक्रार सार्वत्रिक होती. मात्र भविष्यात कार्यक्षेत्रात ऊस उत्पादन वाढविण्याचे आव्हान आपल्याला स्विकारावे लागणार आहे. गटनिहाय ऊस उत्पादन वाढीचे नियोजन करा असे सूचित करून संचालक कामगार आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकत्रितपणे याचे नियोजन करण्याचे आवाहन मंत्री विखे पाटील यांनी केले.
ऊस उत्पादकांना सलग ३ हजार दोनशे रूपये भाव देण्याची कोंडी डॉ. विखे पाटील कारखान्याने फोडली. अनेकांनी त्यावेळेस फोन करून आश्चर्य व्यक्त केले. भावाच्या परंपरेत आपण कुठेही मागे राहाणार नाही. अनेक कारखान्यांनी आपली गाळप क्षमता वाढविली असल्याने ऊसासाठी युध्दजन्य परीस्थीती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेवून कार्यक्षेत्रात हक्काचा ऊस निर्माण करण्यावर लक्ष केंद्रीत करावे लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जलसंपदा विभागाची जबाबदारी आल्यानंतर मागच्या दिड वर्षात पाण्याचे नियोजन चांग्ल्या पध्दतीने झाले आहे. आवर्तन वेळेवर सुटल्याने टंचाई भासली नाही. जिल्हयातून पाणी बाहेर जावू दिले नाही. सर्व चार्याची काम सुरू झाली आहेत. प्रवरा कालव्याच्या नूतनीकरणासाठी १५० कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आल्याने प्रत्येक शेतकऱ्याला पाणी मिळावे म्हणूनच आपला प्रयत्न असेल आशी ग्वाही त्यांनी दिली.
माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील म्हणाले की, कारखान्याने गाळप क्षमता वाढविण्याचा फायदा भविष्यात सर्वाना समजणार आहे. अतिशय वेळेत आणि नाॅनस्टाॅफ कारखाना चालविल्याबद्दल सर्व संचालकाचे कामगारांचे त्यांनी अभिनंदन केले.
चेअरमन डॉ. सुजय विखे पाटील यांनी आपल्या भाषणात कारखान्याच्या प्रगतीमुळे परीसराच्या उज्वल भविष्याची संधी आहे. मात्र नव्या प्रकल्पाचे पूर्ण झालेले काम आणि यशस्वी झालेला गळीत हंगाम हे एक नवे उदाहरण सहकारी साखर कारखानदारी मध्ये निर्माण करण्यात आलेल्या यशाचा अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून कारखान्याला मोठे सहकार्य मिळाले असल्याचा उल्लेख त्यानी आपल्या भाषणात केला.