संगमनेरचे सुपुत्र डॉ. प्रणव पावसे यांना नाबार्डचा राष्ट्रीय पुरस्कार!
◻️ कृषी क्षेत्रातील संशोधनासाठी १ लाख रुपये आणि प्रशस्तीपत्रकाने गौरव
संगमनेर LIVE | बदलत्या हवामानाच्या काळात शेतीपुढील आव्हाने पेलण्यासाठी महत्त्वाचे संशोधन करणाऱ्या संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील डॉ. प्रणव प्रमोद पावसे यांना नाबार्ड कडून ‘उत्कृष्ट डॉक्टरेट प्रबंध - २०२३’ हा राष्ट्रीय स्तरावरील अत्यंत मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. १ लाख रुपये रोख आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून, राष्ट्रीय स्तरावर त्यांच्या कार्याची मोठी दखल घेण्यात आली आहे.
डॉ. प्रणव पावसे यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातून आपले पीएच.डी. संशोधन पूर्ण केले. त्यांनी 'हवामान-स्मार्ट शेती' (Climate-Smart Agriculture) या विषयावर केलेल्या संशोधनात बदलत्या हवामान परिस्थितीत शाश्वत उत्पादन कसे मिळवता येईल, संसाधनांची कार्यक्षमता कशी वाढवता येईल आणि शेतीतील जोखीम कशी कमी करता येईल, यावर विशेष भर दिला आहे. हे संशोधन भविष्यात शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आणि दिशादर्शक ठरणार आहे.
डॉ. पावसे यांची शैक्षणिक आणि संशोधकीय कामगिरी अत्यंत प्रभावशाली आहे. त्यांनी आजवर १ पेटंट आणि १ कॉपीराइट मिळवला असून, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित नियतकालिकांमध्ये त्यांचे २५ संशोधन लेख प्रसिद्ध झाले आहेत. याशिवाय त्यांनी २ शैक्षणिक पुस्तकेही प्रकाशित केली आहेत. त्यांना या संशोधनासाठी डॉ. सचिन मधुकर नलावडे यांचे मार्गदर्शन लाभले. डॉ. प्रणव हे राजहंस दूध संघाचे विद्यमान संचालक डॉ. प्रमोद बबनराव पावसे यांचे सुपुत्र आहेत.
दरम्यान या यशाबद्दल डॉ. पावसे यांचे कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजीत तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात, रणजितसिंह देशमुख, राजेंद्र चकोर, पांडुरंग घुले, ॲड. माधवराव कानवडे आणि सौ. दुर्गाताई तांबे यांच्यासह विविध मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.